(कोल्हापूर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर देशभरात राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. “सोन्याची खरेदी कमी करा, खासगी वाहनांचा वापर मर्यादित ठेवा, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या,” अशा सूचनांवरून विरोधकांसह नागरिकांनी सरकारवर टीका केली आहे.
अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी विजय राठोड यांना निवेदन देत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. “जनतेला काटकसरीचे सल्ले देण्यापूर्वी पंतप्रधानांनी स्वतःचे परदेश दौरे आणि मंत्र्यांचे ताफे कमी करावेत,” अशी मागणी करण्यात आली.
“महागाईवर मौन, जनतेला सल्ले” : हिंदू महासभेचा आरोप
हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले की, घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य नागरिक आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळी महागाई कमी करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याऐवजी जनतेलाच काटकसरीचे सल्ले दिले जात आहेत. निवेदनात खासदार-आमदारांची पेन्शन रद्द करण्याची मागणीही करण्यात आली असून, सरकारी खर्च कमी करण्याची सुरुवात सत्ताधाऱ्यांकडूनच व्हावी, अशी भूमिका मांडण्यात आली.
सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस; मोदींच्या वक्तव्याची खिल्ली
पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा अक्षरशः पूर आला आहे. कौटुंबिक प्रसंग, राजकीय टोलेबाजी आणि विनोदी शैलीत तयार करण्यात आलेल्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेषतः इंधन दरवाढ, सिलेंडरचे वाढते दर आणि सामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण यावरून सरकारला लक्ष्य करण्यात आले. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये संतप्त प्रतिक्रिया नोंदवत केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“हे फसलेलं परराष्ट्र धोरण” : सतेज पाटील यांचा हल्लाबोल
विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही मोदी सरकारवर जोरदार टीका केली. “देशाच्या पंतप्रधानांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे फसलेल्या परराष्ट्र धोरणाची कबुली आहे,” असा आरोप त्यांनी केला. अमेरिका आणि तत्कालीन Donald Trump प्रशासनाच्या दबावाखाली भारताने घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आता सामान्य नागरिकांना भोगावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, “पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर सिलेंडर, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. क्रूड ऑइल स्वस्त असताना त्याचा फायदा जनतेपर्यंत पोहोचवला गेला नाही. आता धोरणात्मक चुका जनतेवर ढकलल्या जात आहेत.” कोविड काळातील “थाळी वाजवा” मोहिमेचा उल्लेख करत त्यांनी मोदी सरकारवर उपरोधिक टीकाही केली.
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतरच केलेली इंधन दरवाढ, सिलेंडरच्या किंमती आणि महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे. आता पंतप्रधानांच्या काटकसरीच्या सल्ल्यानंतर हा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

