(नाशिक)
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) पेपरफुटी प्रकरणात आता नाशिक कनेक्शन समोर आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील शुभम खैरनार याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याने प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. दरम्यान, शुभम खैरनारचे वडील डॉ. मधुकर खैरनार यांनी आपल्या मुलाचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. “माझा मुलगा गेल्या सहा महिन्यांपासून नाशिकमध्ये बीएएमएसची प्रॅक्टिस करत आहे. तो निर्दोष आहे. पोलीसांनी निष्पक्ष चौकशी करावी,” अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांसमोर दिली.
NEET परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत चिंता वाढली
पेपरफुटीच्या आरोपांनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था कडून नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानं देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दोन-दोन वर्षे मेहनत घेऊन तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षेला सामोरं जावं लागणार असल्याने मानसिक ताण वाढला आहे. “आम्ही दिवस-रात्र मेहनत करून तयारी केली होती. पण आता पुन्हा नव्याने परीक्षा द्यावी लागणार असल्याने मोठा मानसिक ताण निर्माण झाला आहे. परीक्षा केंद्रांवर कडक नियम असतानाही पेपर बाहेर कसा गेला, हा मोठा प्रश्न आहे. संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे.” अशी जळजळीत आणि संतप्त भावना विद्यार्थी व्यक्त करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करा – शिक्षण तज्ज्ञांची मागणी
3 मे रोजी झालेली NEET परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय लाखो विद्यार्थ्यांसाठी मानसिक धक्का आहे. अनेक विद्यार्थ्यांनी गेली दोन-तीन वर्षे कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आर्थिक त्याग करून तयारी केली होती. गैरप्रकारांच्या संशयामुळे संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणं अत्यंत वेदनादायी आहे. स्पर्धा परीक्षांवरील विश्वास टिकवण्यासाठी पारदर्शक आणि काटेकोर यंत्रणा उभी करणं अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, आत्मविश्वास आणि भवितव्य लक्षात घेऊन शासन आणि परीक्षा यंत्रणेनं अधिक जबाबदारीनं निर्णय घेण्याची गरज आहे, असे शिक्षण तज्ज्ञांनी म्हटले आहे.
NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संताप
NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियावरही परीक्षा व्यवस्थापन आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, पारदर्शक चौकशीची मागणी जोर धरत आहे.

