(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील राजिवडा परिसरात शुक्रवारी दुपारी घडलेल्या एका दुर्घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. विश्वेश्वर मंदिराजवळ राहणारे राकेश पाटील यांच्या घरावर अचानक एक महाकाय आम्रवृक्ष कोसळल्याने घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, सुदैवाने घरातील सदस्य सुरक्षित राहिल्याने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वेश्वर मंदिर परिसरातील जुना आणि विशाल आंब्याचा वृक्ष अचानक उन्मळून थेट पाटील यांच्या घराच्या छतावर कोसळला. झाड कोसळताना झालेल्या प्रचंड आवाजाने परिसर दणाणून गेला. काही क्षणांतच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत घराच्या छतासह भिंतींचेही मोठे नुकसान झाले असून घरातील साहित्याचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. शिवखोल आणि राजिवडा परिसरातील तरुण व नागरिकांनीही तत्परता दाखवत मदतीचा हात पुढे केला. आपत्तीच्या प्रसंगी स्थानिकांनी दाखवलेली एकजूट आणि संवेदनशीलता याचे परिसरात कौतुक होत आहे.
दरम्यान, आणखी धोका निर्माण होऊ नये यासाठी तातडीने झाड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले. स्थानिक नागरिक, मजूर आणि तरुणांच्या मदतीने कटरच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या कापून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. काही काळ सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो. सुदैवाने घरातील सर्वजण सुरक्षित आहेत. सध्या झाड हटवण्याचे काम सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांनी दिली. या दुर्घटनेत राकेश पाटील यांच्या घराचे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

