(रत्नागिरी)
जातीय जनगणना प्रक्रियेत इतर मागासवर्गीय (ओबीसी) घटकांसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने मोठा अन्याय होत असल्याचा आरोप करत ओबीसी संघर्ष समिती, चिपळूण यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. हा विषय सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत गंभीर असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीनेही आक्रमक भूमिका घेत, ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी देशपातळीवर आवाज बुलंद करण्याचा इशारा दिला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुजन समाज पार्टीचे संस्थापक मान्यवर कांशीराम यांनी ‘ओबीसींसाठी मंडल आयोग लागू करा’ या घोषणेसह देशभरात मोठे आंदोलन उभे केले होते. त्याच विचारधारेवर चालत आजही बसपा ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी वैचारिक आणि संघटित लढा उभारत आहे.
जातीय जनगणनेत ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाविरोधात बहुजन समाज पार्टी ओबीसी बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच बसपाचे राज्यसभेचे खासदार रामजी गौतम हे या मुद्द्यावर राज्यसभेत आवाज उठवतील आणि देशपातळीवर हा विषय मांडतील, तर प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे राज्यभरात ओबीसींसाठी जनजागृती व आंदोलन उभारतील, अशी माहिती देण्यात आली.
बहुजन समाज पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रवीण मर्चंडे, जिल्हा प्रभारी सचिन मोहिते, अनिकेत पवार, जिल्हा महासचिव आनंदा कांबळे यांनी सांगितले की, ओबीसी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष सदैव कटिबद्ध असून, या लढ्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

