(रत्नागिरी)
भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे धर्मशास्त्रातील योगदान न्यायशास्त्रातही उपयुक्त आहे, कारण जो विस्तारित स्वरूपाचा अभ्यास डॉ. काणे यांनी केला त्यावर आधारित राहून न्यायालयाने निकाल दिलेले आहेत. त्यामुळे धर्माकडे बघण्याचा न्यायशास्त्रीय दृष्टीकोन भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांनी दिला असे उद्गार श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य अॅड. डॉ. आशिष बर्वे यांनी काढले.
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी आणि कालिदास विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे आयोजित कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान या चर्चासत्रात ते बोलत होते.
अॅड. डॉ. बर्वे यांनी भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे आणि धर्माचे न्यायिक पुनर्लेखन या विषयवार उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी ५ प्रकरणांचा संदर्भ दिला. डॉ. काणे यांनी वेद, उपनिषदे, स्मृतिग्रंथ यांसारख्या संस्कृत साहित्याचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास केला. ज्यातून त्यांनी मांडलेली मते अत्यावश्यक धार्मिक प्रथा ही संज्ञा स्वातंत्र्योत्तर काळातील केसेसमध्ये न्यायालयांना ठरवण्यात उपयुक्त ठरली. त्यामुळे आजही डॉ. काणे यांचे धर्मशास्त्र प्रेरणा देणारे आहे. आता आपल्या धर्मातील चांगल्या गोष्टींचा वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे.
या वेळी पुणे विद्यापीठातील प्रा. दिनेश रसाळ, डॉ. अनघा जोशी, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे प्रकाश देशपांडे, अकादमीचे सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या प्रमुख आणि कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
प. प. वासुदेवानंद टेंबे स्वामी मार्गदर्शक
प. प. वासुदेवानंद सरस्वती एक योगी, विद्वान, कवी, मार्गदर्शक अशा सर्वांगीण अंगाने आजच्या युवापिढीला त्यांनी रचलेल्या साहित्यातून मार्गदर्शन करणारे आहेत. त्यामुळे प. प. वासुदेवानंद सरस्वतीं आधुनिक भारतातील दिव्य विभूती आहेत, असे प्रतिपादन गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील प्रा. स्नेहा शिवलकर यांनी केले. त्यांनी प.प. वासुदेवानंद सरस्वतीं अर्थात टेंबे स्वामी यांनी लिहिलेल्या दत्त महात्म्य, शिक्षात्रयी, पंचपाक्षिक व अन्य ग्रंथाचा परिचय करून दिला. त्या म्हणाल्या की, प.प. वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबे स्वामी यांचे ज्ञान, कर्म, भक्ती योग यांच्या संगमाने एकत्र असलेले साहित्य व जीवन दत्त संप्रदायातील साधकांना मार्गदर्शन करणारे आहे.

