(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणाऱ्या या क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान संगमेश्वर वासीयांना लाभला. दीर्घकाळच्या संघर्षानंतर पोरबंदर एक्सप्रेस व जामनगर एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनवर अधिकृत थांबा मिळाल्यानंतर, या गाड्यांचे भव्य व जंगी स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
पहिल्या दिवशी पोरबंदर एक्सप्रेस संगमेश्वर स्टेशनवर दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. दुसऱ्या दिवशी जामनगर एक्सप्रेसचेही तितक्याच उत्साहात स्वागत करत संगमेश्वरवासीयांनी आपला आनंद व्यक्त केला.
या ऐतिहासिक यशामागे गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा, आंदोलन, उपोषण आणि लोकशक्तीचा मोठा वाटा आहे. संगमेश्वर रेल्वे स्टेशनसाठी लढा देणाऱ्या सर्व कार्यकर्ते, नागरिक, तसेच पत्रकार संदेश जिमन यांच्या प्रयत्नांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यामुळे आता संगमेश्वर व परिसरातील नागरिकांना थेट गुजरातकडे प्रवास करणे सुलभ झाले असून, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार व भाविक यांना याचा मोठा फायदा होणार आहे. जलद प्रवास शक्य होणार असल्याने आता रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
संगमेश्वर रेल्वे स्टेशनवर थांबा मिळण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपचे सदस्य समीर सप्रे, दिपक पवार, जगदिश कदम, गणपत दाभोळकर, रुपेश कदम, अशोक मुंडेकर, जी. झेड. टोपरे, मंगेश बाईत, आदी सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. हा विजय आंदोलन, संघर्ष काळात पाठबळ बनलेल्या तालुक्यातील जनतेचा आहे, अशी भावना ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केली.

