( रत्नागिरी )
आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सव २०२६ निमित्ताने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानक येथे पथनाट्य सादर केले. या पथनाट्याद्वारे सागरकिनारी आणि नैसर्गिक पर्यटनस्थळी जबाबदार पर्यटनाचा संदेश देण्यात आला.
रत्नागिरीतील विविध सार्वजनिक ठिकाणी या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या पथनाट्यामध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या रिया कुळ्ये, अदिती कुळ्ये, पूर्व चव्हाण, स्नेहल धोपट, दिव्या कीर, ऋषिकेश वाडेकर, प्रेम मालप, सार्थक सावंतदेसाई, पल्लवी निंबरे, साहिल शिंदे, आर्यन जमादार, प्रा. हरेश केळकर यांनी सहभाग घेतला.
येत्या १५ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत चौथ्या सागर महोत्सव- सीव्हर्सचे आयोजन आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनद्वारे करण्यात आले आहे. सागरी जैवविविधता, खाडी, कांदळवन संवर्धनासाठी व्याख्याने, संशोधन, अभ्यास सहल, पथनाट्य माध्यमातून समुद्राबद्दल जनजागृती व सहभाग वाढविणे या हेतूने महोत्सवाचे आयोजन केले आहे. पथनाट्याच्या माध्यमातून मासेमारी, जबाबदार पर्यटन, सागरी जीव सुरक्षा या विषयाचे प्रबोधन व जाणीव जागृती करण्यात येणार आहे. लवकरच विविध ठिकाणी पथनाट्ये सादर केली जाणार आहेत.

