( देवळे / प्रकाश चाळके )
रत्नागिरी कोल्हापूर नागपूर महामार्गावरील घाटीवळे फाट्यानजीक रविवार दि. 7 रोजी रात्री सुमारे अकराच्या वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेने एका सांबराचा मृत्यू झाला. महामार्गाच्या एका बाजूला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या सांबराला पाहून या भागातील नागरिकांनी वनविभागाला कळवले.
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी नागपूर महामार्गावरच्या घाटीवळे फाट्यानजीक दुर्मिळ अशा सांबराचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. रविवारी संकष्ट चतुर्थी असल्यामुळे घाट माथ्यावरील अनेक पर्यटक व भक्त या महामार्गाने गणपतीपुळे येथे गणेश दर्शन साठी जात असल्याने या महामार्गावर रविवारी वाहनांची वर्दळ होती. या महामार्गाचे काम ही चालू असल्याने अचानक गाडी समोर सांबर आले असावे आणि धडक लागून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतआहे. या मृत सांबराला तोंडातून रक्त आलेल्या अवस्थेत पाहून या भागातील अब्बास वाडकर, तनवीर खान, व हॉटेल वक्रतुंडचे मालक शैलेश कामेरकर यांनी त्वरित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले.
सांबर ही कोकणामध्ये दिसणारी दुर्मिळ जात असून त्याचा मृत्यू असा व्हावा ही वाईट घटना असल्याचे प्राणीप्रेमींकडून म्हटले जात असून सांबराच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

