(रत्नागिरी)
तुम्ही फक्त पैशांसाठी काम करू नका. जे काम करत आहात, त्यात आनंद मिळवा. वाणिज्य व्यवस्थापन म्हणजे टीम वर्क, टीम मॅनेजमेंट आहे. नितीमत्ता बाळगा, प्रयत्न योग्य असतील तेव्हाच निकाल चांगला मिळतो, आयुष्यात यश मिळते, हे युवा पिढीने लक्षात ठेवावे, असे प्रतिपादन रत्नागिरीतील प्रतिथयश उद्योजक दीपक गद्रे यांनी केले.
गोगटे- जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतर्फे पीएम-उषा अंतर्गत एक दिवसीय बहुविद्याशाखीय “वाणिज्य व व्यवस्थापन, लेखाशास्त्र व वित्त, आणि अर्थशास्त्र यांवरील जागतिक संवाद” या परिषदेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हॉटेल विवा एक्झिक्युटीव्ह येथे ही एकदिवसीय परिषद झाली.
उद्घाटनप्रसंगी मंचावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, निमंत्रक व प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सीमा कदम उपस्थित होत्या. परिषदेमध्ये मलेशिया येथील डॉ. अनबीया खैरील यांनी ऑनलाइन माध्यमातून आणि डॉ. केतन वीरा यांनी कार्यक्रमात बीजभाषण सादर केले.
याप्रसंगी शिल्पा पटवर्धन म्हणाल्या की, पुढचे बघण्याची दृष्टी आहे, तो माणूस मोठा होतो. माझ्यात काय त्रुटी आहे, काय करू शकतो याचा विचार करा. तेव्हा कोकणी माणूस पुढे जातो. आतापर्यंत अशा चार परिषदा झाल्या त्यामध्ये मुलांना काय नवीन कळले ते विचारा म्हणजे त्यातून अनेक नवीन गोष्टी कळतील. उपकार्याध्यक्ष अॅड. साखळकर यांनीही या परिषदेला शुभेच्छा दिल्या. डॉ. साखळकर यांनी महाविद्यालयाची स्थापना, कोकणातील अग्रगण्य महाविद्यालय, नवीन शैक्षणिक धोरण व स्वायत्तता याविषयी विचार व्यक्त केले.
या परिषदेमध्ये जगातील विविध देश आणि भारतातील विविध राज्यांमधील संशोधक, विद्वान, उद्योजक व व्यावसायिक, प्राध्यापक व विद्यार्थी असे मिळून एकूण ३५० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. या वेळी विविध विषयांवरील ८० पेक्षा जास्त शोधनिबंधांच्या पुस्तिकेबाबत डॉ. रुपेश सावंतदेसाई यांनी माहिती दिली. त्यानंतर मान्यवरांनी त्याचे प्रकाशन केले. डॉ. यास्मिन आवटे यांनी डॉ. गद्रे यांचा परिचय करून दिला. उपप्राचार्या डॉ. सीमा कदम यांनी मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची सुरवात व प्रगतीचा आढावा घेतला. डॉ. मिनल खांडके यांनी आभार मानले.

