(संगमेश्वर / एजाज पटेल)
काल दिनांक २० नोव्हेंबर रोजी रात्री १० नंतर सोनवी पुल गर्डरकामाला प्रत्यक्ष सुरुवात होणे आवश्यक होते, कारण पथकाद्वारे महामार्ग प्राधिकरणाने रस्ता रात्री १० वाजल्यानंतर वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. याच निर्देशाचे पालन करताना रात्री चक्क ९ वाजताच कर्मचाऱ्यांनी मनमानी करुन बॅरीकेट लाऊन रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. या बेजबाबदार कृतीमुळे लांबलचक रांगा वाहनांच्या लागल्या. प्रचंड मनस्ताप वाहन चालकांना सोसावा लागला. याबाबत अधिकारी वर्गाला जाब विचारण्यासाठी काही लोक सरसावले. पण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कुणी जबाबदार व्यक्ती हजरच नसल्याचे उपस्थित लोकांना कळले.
नेमकं चाललंय तरी काय? हा प्रश्न एकमेकांना जो तो विचारत होता. एवढंच नव्हे तर सर्वत्र यामुळे संतापाच्या चर्चेचे वारे वाहू लागले.
खरोखरच एवढे मोठे कार्य रामभरोसे सोडून अधिकारीच डाराडूर झोपले होते काय? रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याची जबाबदारी ही ठेकेदारांनी नेमलेल्या लोकांवर सोपावली कुणी? एक ना अनेक प्रश्न यावेळी उपस्थितांना पडले. दहा ऐवजी नऊ वाजताच संगमेश्वर बस स्थानकासमोरील मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आल्याने वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला. यामुळे वाहनचालकांसह प्रवाशी जनता संताप व्यक्त करत होते.
महामार्गावर लावण्यात आलेल्या पर्यायीमार्ग सूचना फलकावर रात्रौ दहा वाजताची वेळ असताना ठरलेल्या वेळेत वाहतूक बंद ठेवण्याची जबाबदारी कोणाची? जर वेळ तुम्ही ठरवता, मग सवडीने ती वेळ बदलण्याचे अधिकार कोणाला आहेत. वाहन चालक व प्रवाशी जनतेला मनस्ताप होईल याचा विचार न करता कोणाच्यातरी हितासाठी वेळ बदलली गेली का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात असून हा एकप्रकारे आनागोंदी प्रकार सुरु आहे.
नियोजन शून्य करभाराचा फटका वाहन वर्दळीला तर बसत आहे. मात्र यातून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या रुग्णवाहिकेला सुद्धा वाहतून कोंडीत अडकून रहावे लागले. बुधवारी रात्री गर्डर चे काम करत असताना पोलीस निरक्षक यांच्या उपस्थित कामाच्या ठिकाणी मोठा पोलीस फाटा महामार्गावर उपस्थित असताना वाहनांच्या रांगेत एका रुग्णवाहिकेला थांबून रहावे लागले. रुग्णवाहिका, अग्निशमक वाहन आदी अत्यावश्यक वाहनांना प्रधान्याने रस्ता मोकळा करून देणे अत्यावश्यक असताना या ठिकाणी पोलिसांच्या उवस्थितीत रुग्ण नेणाऱ्या रुग्णवाहिकेला अडकून रहावे लागले होते.
जनतेच्या जीवावर व जनतेला त्रासदायक ठरणारा हा मनमानी आणि बेजबाबदार कारभार सुरु आहे. जनतेच्या नजरेतून अशा घटना चुकत नसून हा सर्व कारभार कोणाच्या हितासाठी केला जात आहे. आणि याला आवर कोण घालणार का? सर्वसामान्य जनता आणि वाहनचालकांना कोणी वाली आहे का? अशी संतप्त चर्चा सुरु आहे.

