(राजापूर / तुषार पाचलकर)
संयुक्त राष्ट्रसंघाच्या ब्राझीलमधील हवामान बदल COP30 परिषदेसाठी भारत सरकारच्या शिष्टमंडळात कोंकणातील राजापूर तालुक्यातील रायपाटण गावचे सुपुत्र व भाजप नेते संतोष गांगणयांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल संतोष गांगण यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या ब्राझील येथे होत असलेल्या जागतिक हवामान बदल परिषदेत (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज – COP) हवामान बदलाच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी जगभरातील सर्वच देश एकत्र आले असून काही चर्चा, वाटाघाटी, करार होत आहेत. भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच्या COP परिषदेत भारतच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले आहे. यावर्षी COP30 परिषदेत केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री. भूपेंद्र यादव भारताचे नेतृत्व करीत आहेत. सदर परिषदेमध्ये हवामान बदलाचा सामना कसा करायचा यावर चर्चा केली जाते. यामध्ये ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी करणे, हवामानातील बदलांना अनुकूल धोरणे स्वीकारणे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक मदतीची व्यवस्था करणे यांसारख्या विषयांवर भर दिला जातो.
भाजप नेते संतोष गांगण केंद्र शासनाच्या विविध समितीवर सदस्य असून राष्ट्रीय पातळीवर विविध सामाजिक संस्थामध्ये कार्यरत आहेत. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत दिशा समितीचे सदस्य असून स्वच्छ भारत मिशन प्रभावी राबाविण्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा करताना वेस्ट मॅनेजमेंटसाठी नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्प काही शासकीय संस्थाना सुचविले आहेत. तसेच त्यांनी निसर्ग संवर्धन विषयावर काम विविध सामाजिक संस्थासोबत काम करीत आहेत.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या ब्राझीलमधील बेलिअम शहरात होणाऱ्या हवामान बदल परिषदेसाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमंत्रणासहीत भारत सरकारच्या शिष्टमंडळात त्यांचा समावेश केला असून सदर परिषद १० ते २१ नोव्हेंबर या कालावाधित होत आहे. केंद्राच्या विविध मंत्रालयाचे अधिकारी व सामाजिक संस्था प्रतिनिधी भारत सरकारच्या वतीने सदर परिषदेत सहभागी झालेले आहेत.
संसदेत किंवा विधिमंडळाचे प्रतिनिधि नसतानासुद्धा संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत भारत सरकारच्या वतीने सहभागी होणारे संतोष गांगण कोकणातील एकमेव सामाजिक कार्यकर्ते असतील. सदर परिषदेत “हरित भारत” या खऱ्या भावनेने हवामान कृतीवरील भारताच्या दृष्टिकोनाला चालना देण्याबाबत चर्चा होईल. हवामान बदलाशी लढण्यासाठी सामूहिक जागतिक प्रयत्नांमध्ये भारताचे योगदान अधोरेखित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. भारताचा शाश्वत दृष्टिकोन आणि समावेशक हवामान कृतीचा संदेश पुढे नेण्यासाठी सामायिक वचनबद्धतेने भारताचे प्रतिनिधित्व केले जाईल. भारतीय संस्कृती पर्यावरणचा आदर करणारी असून त्याचा आदर्श विश्वातील प्रत्येक देशाने घेतल्यास हवामान बदलच्या समस्येवर तोडगा मिळण्यास निश्चित मदत होईल हा संदेश दिला जाईल.

