(मुंबई)
राज्यात दिवाळी उत्सवाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने वसुबारस (गोवत्स द्वादशी) या सणाने होते. आज या दिवशी शेतकरी वर्ग आणि गृहस्थ मंडळी गाई-वासराची पूजा करून समृद्धी, आरोग्य आणि आनंदाची कामना करतात. यंदा रमा एकादशीनंतर आज (१७ ऑक्टोबर २०२५) रोजी वसुबारस साजरी केली जाणार आहे. या दिवसापासूनच दिवाळीचा सोहळा अधिकृतरीत्या सुरू होतो.
वसुबारसचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
भविष्य पुराणात वसुबारसला ‘नंदिनी व्रत’ असं म्हटलं आहे. शैव परंपरेत नंदिनी (गाय) आणि नंदी (बैल) हे दोघेही पवित्र मानले जातात. या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा करून मानव आपल्या उपजीविकेचा आणि मातृत्वाचा आधार असलेल्या गाईबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
कथेनुसार, राजा उत्तानपाद आणि त्यांची पत्नी सुनीती यांनी गोवत्स द्वादशीचे व्रत केल्यानंतर त्यांच्या घरी ध्रुव नावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. म्हणूनच या व्रताला संतानसुख आणि कल्याणाची कामना करणारे व्रत मानले जाते. या दिवशी स्त्रिया गहू आणि दुधापासून बनवलेले पदार्थ टाळतात, कारण हे अन्न त्या दिवशी पूजेसाठी गायीला अर्पण केले जाते.
वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त
या वर्षी आज वसुबारस (शुक्रवार, १७ ऑक्टोबर) रोजी साजरी होईल. या दिवशी बुधादित्य राजयोग, शुक्ल योग, ब्रह्मा योग आणि सिद्धी योग असे अनेक शुभ योग जुळून आले आहेत. द्वादशी तिथी सकाळी ११:१२ वाजता सुरू होऊन १८ ऑक्टोबर दुपारी १२:१८ वाजता संपेल. गाई-वासराची पूजा करण्यासाठी संध्याकाळी ५:४९ ते रात्री ८:२० हा शुभ मुहूर्त मानला जात आहे.
वसुबारस पूजन विधी
कार्तिक कृष्ण पक्षातील द्वादशीला सकाळी गाई-वासराला स्नान घालून त्यांना फुलांचे हार, रंगीबेरंगी वस्त्र आणि हळदीचा तिळा लावला जातो. संध्याकाळी पूजेदरम्यान त्यांना गव्हाचे पदार्थ, हरभरा आणि मूग नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात आणि त्यानंतर आरती केली जाते. अनेक घरांमध्ये या वेळी गाई-वासराच्या मूर्तीचीही पूजा केली जाते.
भारतीय ग्रामीण समाजात गाय ही आईचे प्रतीक आणि अन्नदात्री मानली जाते. त्यामुळे वसुबारस हा सण केवळ धार्मिकच नव्हे, तर कृतज्ञतेचा आणि मातृभावनेचा उत्सव मानला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी उपवास करून पूजा करतात.

