(देवरूख / सुरेश सप्रे)
देवरुखातील प्रसिध्द सोने व्यापारी धनंजय तथा तात्या केतकर यांचे अपहरण प्रकरणी एकूण १२ आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सोने व्यापारी धनंजय तथा तात्या केतकर यांचे अपहरण करून अंगावरील दागिने लुटून खंडणीची मागणी केल्यानंतर त्यांना मारहाण करून सोडून देण्यात आले होते. या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
या अपहरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितिन बगाटे यांनी देवरूख पोलीस व गुन्हा अन्वेषण विभागाला मार्गदर्शन करत पोलीसांची विविध पथके स्थापन करून जलदगतीने तपास सुरू केला होता.
या अपहरण प्रकरणाचा अवघ्या चारच दिवसात छ्डा लावत प्रथम चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यात चारपैकी दोन आरोपी हे साखरपा-भडकंबा भागातील स्थानिक असल्याचे उघड झाले होते.
या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास करताना गुन्हाअन्वेषण विभागाच्या मदतीने देवरुख पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले आहे. मात्र, या गुन्ह्यातील पाच मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत झाली आहे.
सोने व्यापारी धनंजय केतकर हे साखरप्याहून देवरुखच्या दिशेने येत असताना वांझोळे येथे त्यांचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडील दागिने आणि रोख रक्कम लुटून त्यांना काही अंतरावर असलेल्या वाटूळ येथे सोडून दिले होते. या घटनेनंतर केतकर यांनी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली. गुन्हा अन्वेषण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही दिवसांतच या गुन्ह्याचा पर्दाफाश केला.
आत्तापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक करून दोन गाड्या ही जप्त केल्या त्यात हिंदुराष्ट्र सेना स्टीकर असलेली गाडीचाही समावेश आहे.
या सात अपहरणकर्त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या गुन्ह्याच्या मुळाशी जाताना एक महत्त्वाची बाब उघड झाली. संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव व भडकंबा येथील हिंदुराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यासह दोन स्थानिक तरुणांनी मुंबईजवळील बदलापूर येथील तरुणांना हाताशी धरून व्यापारी केतकर यांचे अपहरण केल्याचे उघड झाले आहे.
तपासाच्या अंतिम टप्प्यात, या अपहरणाच्या कटात सामील असलेल्या आरोपींची एकूण संख्या १२ असल्याचे निश्चित झाले आहे. यातील ५ आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

