(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाच्या देव- घैसास- कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील करियर कट्टा विभाग व आयक्यूएसी यांच्या सहकार्याने नुकताच विद्यार्थी संवाद आयोजित करण्यात आला होता. या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाला महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष डॉ. यशवंत शितोळे सर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर हा कशासाठी केला पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. मोबाईलचा वापर करून आपल्या करियरला योग्य दिशा देण्याच काम आपण करू शकतो हे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी काय केले पाहिजे याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. करियर कट्टा उपक्रमाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचीही यावेळी शितोळे यांनी माहिती दिली.
त्यानंतर महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला करियर कट्टा रत्नागिरी जिल्हा समन्वयक डॉ. शिवाजी उकरंडे, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. वसुंधरा जाधव, आयक्यूएसी समन्वयक सौ. राखी साळगावकर आणि महाविद्यालयाच्या करियर कट्टा समन्वयक प्रा. हर्षदा लिंगायत उपस्थित होत्या. त्याचबरोबर सर्व शाखेचे प्राध्यापक आणि विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा मिथिला वाडेकर यांनी केले. प्रा. स्मार्था कीर यांनी आभार मानले. अशा पद्धतीने अतिशय उत्साही वातावरणामध्ये महाविद्यालयामध्ये करियर कट्टा अंतर्गत विद्यार्थी संवाद संपन्न झाला.

