(दौंड)
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात रावणगाव येथे बुधवारी (दि. १ ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर काही वेळातच स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतांमध्ये जयश्री अशोक गावडे (वय ४५) व पती अशोक मारुती गावडे (वय ५०) यांचा समावेश आहे. गावडे दांपत्य शेती करून उदरनिर्वाह करत होते. उपलब्ध माहितीनुसार, दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यातून अशोक गावडे यांनी पत्नी जयश्री यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर अपराधगंडामुळे किंवा संतापातून त्यांनी राहत्या घरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी गावकऱ्यांना ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. गावडे दांपत्यामागे दोन मुले असून, या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

