(छ. संभाजीनगर)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा झटका बसला आहे. प्रकाश महाजन यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती. आता प्रकाश महाजन यांनी मनसेचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी पक्षाच्या प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन हे पक्षात अस्वस्थ असल्याचं दिसत होतं. छत्रपती संभाजीनगरात हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जातोय. माझी अपेक्षा नव्हती पण उपेक्षा झाली, असे म्हणत त्यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली.
पक्षाचे काही ठराविक कार्यक्रम आणि मेळाव्यांपासून प्रकाश महाजन यांना लांब ठेवण्यात आले होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. मनसेच्या नाशिकच्या मेळाव्याला प्रकाश महाजन यांना बोलावण्यात आले नव्हते, म्हणून प्रकाश महाजन दुखावले गेले होते. त्यांनी आपली खदखद बोलून दाखवत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. गंगेला बोल लावला तेव्हा खरतर मी तेव्हाच थांबायला हवे होते, मला वैयक्तिक अपेक्षा नव्हती, पदाची अपेक्षा नव्हती, फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा ही अपेक्षा पण वाटेल उपेक्षा आली, असे म्हणत महाजन यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. महाजन यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोठा धक्का मानला जात आहे.
प्रकाश महाजन काय म्हणाले?
मी प्रकाश महाजन माझा राजकीय परिचय आपणास दिला पाहिजे असे नाही. आज मी तुमच्यासमोर या गोष्टीसाठी आलो आहे कुठेतरी आपण आता थांबले पाहिजे ही भावना गेली काही दिवसांपासून माझ्या मनात सारखी येत आहे. खरे म्हणजे मी गंगेला बोल लावला त्याच वेळी थांबायला पाहिजे होते. खरं म्हणजे पहेलगामच्या वेळी मी थांबायला पाहिजे होते. पण त्यावेळी मला असे वाटले की कुठेतरी काहीतरी सुधारणा होईल. कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला निवडणुकीचे तिकीट मिळण्याची गरज नव्हती. कुठल्या पदाचीही गरज नव्हती. फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती. परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली. लोकसभेच्या रणधुमाळीत कधी मला विचारण्यात आले नाही, विधानसभेच्या वेळी प्रचारापुरते मला वापरण्यात आले. जी जी जबाबदारी माझ्यावर देण्यात आली ती मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली, असे प्रकाश महाजन म्हणाले.
जे पाप माझ्याकडून घडले नाही, त्याचे प्रायचित्त मला देण्यात आले. माझ्या कामाचं कौतुक नाही, मग माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाहीत त्याचे बोल मला लावण्यात आले. जे पाप माझ्याकडून घडले नाही, त्याचे प्रायचित्त मला देण्यात आले. खरं म्हणजे मी फक्त अमित ठाकरे यांचा थोडा अपराधी आहे. कधी कधी माणसाच्या क्षमतेप्रमाणे योग्य ते त्याला मिळत नाही. हा नशिबाचा एक भाग मी समजतो. असंख्य मनसैनिकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं. वेळोवेळी ते सर्वर्थाने माझ्यासाठी धावून आले. त्या सर्व मनसैनिकांचा मी कायमचा ऋणी राहील. पण मला असं वाटतं की आता आपण थांबलं पाहिजे. कुठेतरी या मनोरुग्न अवस्थेतून बाहेर आले पाहिजे आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय घेतला आहे, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.

