(मुंबई)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यास प्रतिबंध घातला होता. मात्र, बुधवारी (२७ ऑगस्ट) सकाळी सर्व विरोध झुगारून जरांगे यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला.
यानंतर, मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी अटी-शर्तींसह परवानगी दिली. या परवानगीच्या बदल्यात मनोज जरांगे यांनी स्वतःच्या सहीने २० आश्वासनांसह हमीपत्र मुंबई पोलिसांकडे सादर केले आहे.
मनोज जरांगे यांनी हमीपत्रातून दिलेली आश्वासने
- कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मागणी केल्यावर त्यास दाखवण्यासाठी आंदोलनासाठी मिळालेली परवानगीची मूळ प्रत सोबत असेल.
- पोलीसाना नियमित संपर्क साधता येईल यासाठी पांडुरंग मारक या जबाबदार व्यक्तीची प्रतिनियुक्ती करेल
- नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी विचारविनिमय करून पिण्याचे पाणी (टँकरद्वारे पुरवठा करून) आणि प्रथमोपचार/वैद्यकीय मदत यांची सभास्थळी आणि धरणे/निदर्शन कालावधीत पर्याप्त व्यवस्था करेल.
- मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, धरणे आणि निदर्शने इत्यादी सुव्यवस्थित रीतीने करण्यात येतील आणि वाहतुकीच्या सामान्य ओघामध्ये अडथळा आणणार नाही. तसेच वाहनतळ आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यात येईल.
- मी आणि इतर व्यक्ती, धरणे आणि निदर्शने इत्यादीमध्ये सहभागी होणाऱ्यांची मर्यादा, माझ्या निवेदनात विनिर्दिष्ट केलेल्या संख्येपर्यंतच मर्यादित ठेवील आणि कोणत्याही परिस्थितीत त्यात वाढ होऊ देणार नाही.
- पोलिसांना सहाय्य करण्यासाठी पुरेशा संख्येतील स्वयंसेवकांना त्या स्थळी आणि त्या स्थळाभोवती तैनात करण्यात येईल. तसेच संपर्काच्या तपशीलासह स्वयंसेवकांची यादी आगाऊ स्वरुपात पोलिसांना पुरवली जाईल, याची मी आणि इतर आयोजक खात्री करतील.
- मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, धरणे, निदर्शनं आणि सभा इत्यादी विहित ठिकाणी/स्थळीच घेण्यात येतील.
- धरणे आणि निदर्शन इत्यादी विहित कालावधीत म्हणजेच सकाळी 09:30 ते सायंकाळी 05:30 या वेळेत घेण्यात येतील, याची मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील.
- मी आणि इतर आयोजक ध्वजांसाठी/फलकांसाठी 2 फुटांपेक्षा अधिक लांबीची काठी वापरणार नाही. ध्वजाचा/फलकांचा आकार 9 फूट 6 फूट किंवा त्यापेक्षा कमी असेल. तसेच सहभाग घेणाऱ्या व्यक्ती, काठीवरील ध्वज/फलक, इत्यादी केवळ प्रदर्शनाच्या हेतूनेच जवळ बाळगतील.
- धरणे आणि निदर्शन इत्यादींमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती, आक्रमणकारी हत्यार म्हणून वापरले जाण्याचा संभव असतील अशा लाठ्या, अग्निशस्त्रे, भाले, तलवारी आणि इतर वस्तू जवळ बाळगणार नाहीत. मी याची खात्री करील की,सहभागी होणारी कोणतीही व्यक्ती, ज्यामुळे मानवी जीवितास किंवा त्याच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अथवा सार्वजनिक शांतता भंग होईल किंवा दंगा उसळेल असे काणतेही नकली अग्निशस्त्र किंवा इतर कोणतेही अग्निशस्त्र जवळ बाळगणार नाहीत, याची मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील.
- आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती चिथावणीखोर भाषणे करणार नाही किंवा जमावाच्या भावना भडकवणारी किंवा त्यांना चिथावणी देणारी किंवा विविध गटांमध्ये धर्म, वंश, स्थान किंवा जन्म, निवास, भाषा, इत्यादी कारणावरून शत्रुत्व निर्माण करणारी किंवा तसा संभव असणारी भाषा वापरणार नाहीत. तसेच अशा गटांमधील सलोखा राखण्यास बाधक ठरणारी किंवा सार्वजनिक प्रशांतता बिघडविणारी अशी कोणतीही कृती कोणत्याही रीतीने करणार नाही, याची मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील.
- धरणे आणि निदर्शन इत्यादीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती, पोलीस आयुक्त, मुंबई यांनी किंवा कर्तव्यावर असलेल्या इतर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने, मेळावा किंवा धरणे/निदर्शने इत्यादीच्या कोणत्याही टप्प्यावर दिलेल्या सर्व कायदेशीर निदेशांचे तात्काळ अनुपालन करतील, याची मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील.
- सहभागी होणारी कोणतीही व्यक्ती सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात येईल किंवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण होईल, जाळपोळ, इत्यादी होईल अशा रीतीने कोणतीही कृती करणार नाही किंवा इतर कायद्याचे उल्लंघन होईल, अशी कोणतीही गोष्ट करणार नाही.
- आंदोलनात सहभागी होणाऱ्या व्यक्तीमुळे कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तीचा अपमान होईल, या उद्देशाने कोणतेही प्रार्थनास्थळ किंवा व्यक्तीच्या कोणत्याही वर्गाने पवित्र मानलेली कोणतीही वस्तू नष्ट करणार नाही. तिचे नुकसान करणार किंवा ती अपवित्र करणार नाही.
- धरणे आणि निदर्शनाच्या विहित ठिकाणावरून कूच करण्याच्या अविर्भावात जाणार नाही. या कालावधीत, मी आणि इतर आयोजक पोलिसांच्या सूचनांचे/निदेशांचे अनुपालन करू.
- मी आणि इतर आयोजक कोणत्याही प्रकारची कागदपत्रे, पुस्तके आणि प्रतिमा जाळणार नाही आणि अन्न शिजवण्यास, कचरा करण्यास घोषणा फलक, प्लास्टिक कचरा फेकण्यास प्रोत्साहन देणार नाही.
- मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, विनिर्दिष्ट परवानगीशिवाय, धरणे, निदर्शन, ध्वनिक्षेपकाचा किंवा जनसंबोधन यंत्रणेचा वापर करणार नाही. तसेच निर्देशित अधिकाऱ्याने परवानगी दिलेली असेल, त्यानुसार सकाळी 09:30 ते सायंकाळी 05:30 या वेळेतच केवळ ध्वनिक्षेपक वापरण्यात येईल.
- ट्रॅक्टर, ढकलगाडी (ट्रॉली), बैलगाडी, सायकल-रिक्षा, हातगाडी यांसह कोणतीही वाहने किंवा पक्षी, घोडे, हत्ती, उंट, कोंबड्या, इत्यादीसारखे प्राणी धरणे, निदर्शने, इत्यादी ठिकाणी आणली जाणार नाहीत, याची मी आणि इतर आयोजक खात्री करतील.
- मी अनुयायांना नियंत्रणाखाली ठेवण्यास जबाबदार असेल आणि त्यात निष्फळ ठरल्यास माझ्यासह इतर आयोजकांवर विद्यमान कायद्याच्या तरतुदीन्वये खटला दाखल करावा.
- मी आणि इतर आयोजक हमीपत्रातील मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करतील आणि पोलीसांना सर्व परिस्थितीत सहकार्य करतील.
मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनावरून वादंग निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते व प्रवक्त्यांनी जरांगे यांना गणेशोत्सव संपल्यानंतर आंदोलन करण्याची विनंती केली होती. दरम्यान, त्यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीत जरांगे यांनी परवानगी घेऊन आंदोलन करण्याची तयारी दर्शवली. त्यावर न्यायालयाने त्यांना मुंबईबाहेर, नवी मुंबईतील खारघर येथे आंदोलन करण्याचे सुचवले. मात्र, जरांगे हे आझाद मैदानावरच आंदोलन करण्यावर ठाम आहेत.
“आमच्यामुळे हिंदूंच्या सणाला अडथळा कसा होऊ शकतो? हे सरकारचे मराठा समाजाविरोधातील षडयंत्र आहे,” असा आरोप करत त्यांनी ही लढाई आता ‘करा वा मरा’ अशी असल्याचे जाहीर केले. तसेच राज्यातील मराठा समाजबांधवांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. जरांगे यांच्या या आवाहनानंतर बीड, नांदेड, परभणी आदी भागांतून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.
मनोज जरांगे यांच्या ताफ्यातल्या वाहनांवर दगडफेक

