(मुंबई)
नाणीज दक्षिण पिठाचे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करावा, अशी विनंती राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे की, “रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे आध्यात्मिक तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजजागृतीचे कार्य अविरत सुरू आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण राष्ट्राला याचा अभिमान आहे. गेल्या अनेक दशकांपासून त्यांच्या निःस्वार्थ सेवा आणि समर्पित प्रयत्नांमुळे समाजावर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यांनी दोन पिढ्यांना धार्मिक प्रेरणा दिली आहे. समाजात नैतिक मूल्यांची जपणूक त्यांच्यामुळे झाली आहे.
महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी तसेच लोककल्याणासाठी त्यांनी केलेली कार्ये अत्यंत अनन्यसाधारण आहेत. त्यांच्या आयुष्यभराच्या आध्यात्मिक साधनेसाठी व समाजसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार देणे हे निश्चितच गौरवाचे ठरेल, अशा शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली असून त्यांनी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या कार्याचा गौरव केला आहे.
रामानंदाचार्य नरेंद्रचायजी यांनी अनेक समाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये अपघातग्रस्तांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू आहे. ती अपघातस्थळी जाऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करते. त्याच्यावर उपचार सुरू होऊन प्राण वाचतात. आज ५३ रुग्णवाहिका कार्यरत आहेत.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना अभ्यासासाठी देहदान उपक्रम सुरू केला होता. अवयव दानामुळे अनेकांचे आयुष्य फुलते. दरवर्षी संस्थांतर्फे रक्तदान मोहीम सुरू असते. लाखावर बाटल्या रक्त शासकीय दवाखान्यांना दिले जाते. रुग्णांची गरज ओळखून त्यांना तिथे जाऊन “ब्लड इन निड” द्वारे रक्त पुरवले जाते. तसेच १२ वी पर्यंत मोफत इंग्रजी माध्यमाची शाळा, हिंदू धर्म पुनर्प्रवेश, व्यसनमुक्ती, दुर्बल घटकांना मदत, वेदपाठशाला, अन्नदान असे अनेक उपक्रम राबवले जातात. एवढे मोठे कार्य आज कोणीच करताना दिसत नाही. म्हणून ही मागणी त्यांनी केली आहे.

