(नवी दिल्ली)
१५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार, अशा जुन्या वाहनांच्या नोंदणी शुल्कात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. हा निर्णय प्रदूषण नियंत्रण आणि वाहनांच्या देखभालीचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
नव्या दरांनुसार, १५ वर्षांपेक्षा जुन्या मोटरसायकलच्या नोंदणीसाठी आता ₹२,००० भरावे लागणार आहेत. तीन चाकी वाहनांसाठी हे शुल्क ₹५,००० असून, कार, जीप, व्हॅन आणि लहान ट्रक (वैयक्तिक किंवा व्यावसायिक वापरासाठी) यासाठी ₹१०,००० मोजावे लागणार आहेत.
परदेशातून भारतात आणलेल्या जुन्या वाहनांसाठी तर अधिक शुल्क आकारले जाणार आहे. २ किंवा ३ चाकी वाहनांसाठी ₹२०,००० तर ४ चाकी वाहनांसाठी तब्बल ₹८०,००० इतका दर निश्चित करण्यात आला आहे. इतर मोठ्या वाहनांसाठी ₹१२,००० इतके शुल्क आकारले जाईल.
जुन्या वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण आणि त्यांची देखभाल खर्चिक ठरत असल्यामुळे त्यांचा वापर हळूहळू कमी व्हावा, हा या धोरणामागचा मुख्य उद्देश आहे. सरकारच्या या निर्णयामुळे वाहनधारकांवर काहीसा आर्थिक भार पडणार असला, तरी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने हे एक सकारात्मक आणि दूरदृष्टीचा निर्णय ठरणार आहे.

