(संगमेश्वर / एजाज पटेल)
गेल्या दोन महिन्यात फुणगूस – जाकादेवी मुख्य मार्गावर फुणगूस येथील पशुवैद्यकीय दवाखान्या समोरील वळणावरील एका विशिष्ट ठिकाणी अपघात घडण्याच्या घटनांमध्ये वाढ़ झाली आहे. विशेषतः या भागात एकाच ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक रहिवाशी वर्गात व वाहन चालकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी संध्याकाळी गणपतीपुळे येथून मुंबईयेथे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाचा याच ठिकाणी अपघात घडला आहे. मात्र सुदैव म्हणावे लागेल, कोणालाही यात इजा झालेली नाही.
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शास्त्रीपुल आंबेड येथून डिंगणी -फुणगूस पुलावरून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने या मार्गांवरचा वाहचालक सर्रासपने वापर करताना दिसतात. मात्र फुणगूस – जाकादेवी या मुख्य मार्गावर फुणगूस येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील तीव्र अवघड चढ -उताराच्या वळणावर गेल्या दोन महिन्यात सहा अपघाताच्या घटना घडल्या. या मार्गांवरून येताना वाहने थेट वीस ते तीस फूट खोल दरीत जातात. अपघातांची ही भीषणता व थरकाप उडवणारी दृश्य पाहता अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी काही वाहनांचे तसेच वाहतूक करण्यात येणाऱ्या सामानाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
फुणगूस ते जाकादेवी हा मार्ग तीव्र चढ -उतार आणि अवघड वळणाचा मार्ग आहे. अनेकदा वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडत आहेत. येथील चढ -उतार, वळण आदी ठिकाणी सूचना फलक, साईड गर्डर चा अभाव अपघाताला कारण ठरत असून यापूर्वी तसेच सातत्याने होणारे अपघात पाहता या ठिकाणी गर्डर, सूचना फलक लावण्याची मागणी करूनही सबंधित विभाग डोळेझाक करत आहे. मात्र याचे भोग नाहक वाहन चालकांना भोगावे लागत आहेत.
रविवारी संध्याकाळी गणपतीपुळे येथून MH 02/FN 5232 चारचाकी वाहन घेऊन महेश शर्मा मुबंईकडे जात असताना फुणगूस येथे आले असता याच ठिकाणच्या उतारावरील वळणावर आल्यानंतर थेट त्यांच्या ताब्यातील वाहन रस्ता सोडून बाजूच्या दरीत गेली. मात्र एका झूडपामुळे खोल दरीत जाताजाता गाडी वाचली. या चारचाकी वाहनातून चार प्रवाशी प्रवास करत होते. सुदैवाने त्यांना कोणालाही दुखापत झाली नसल्याचे फुणगूस येथील पोलीस पाटील प्रशांत (नान्या) थूळ यांनी पत्रकारांना सांगितले.
या एकाच ठिकाणी अपघात घडत असल्याने स्थानिक जनतेसह वाहनचालकात चिंतेचे व भीतीचे वातावरण पसरले असून या वृत्तामुळे अनेक वाहनचालकांनी अपघाताचे संकट ओढवून घेण्यापेक्षा निवळी मार्गे गणपतीपुळे तसेच त्या मार्गांवर जाण्यासाठी लांबचे अंतर पडवडेल, पण हा मार्ग नको म्हणून पाठ फिरवण्यास सुरु केली आहे. त्यामुळे नेहमी वाहन वर्दळीने गजबजणारा रस्ता सामसूम झालेला दिसून येत आहे.

