(दापोली)
कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या ‘युवा प्रेरणा कट्टा’ टीमने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दापोलीत ‘एक राखी जवानांसाठी; देशाच्या रक्षकांसाठी’ हा उपक्रम आयोजित केला. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर, भारतीय सैन्यदलाने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकवला. त्यांच्या प्रती आदर व्यक्त करणे हा यावर्षीच्या अभियानाचा मुख्य उद्देश होता.
दापोलीतील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनी तसेच काही सामान्य महिला भगिनींनी या उपक्रमात सहभागी होऊन राख्या जमा केल्या. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद पांगारकर, नचिकेत बेहरे, संदीप गरंडे, श्रीप्रीती वैद्य, साक्षी करमरकर, सुमेध करमरकर, रोहन भावे इत्यादी कार्यकर्त्यांसह युवा टीमने विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमाबाबत बोलताना मिहीर महाजन म्हणाले, “भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा २०२२ मध्ये प्रथमच या उपक्रमाची सुरुवात केली. त्या वेळी ७५ हून अधिक शाळा व महाविद्यालयांतून राख्या जमा करून सीमेवर पाठवल्या होत्या. तेव्हापासून दरवर्षी हा उपक्रम आयोजित केला जातो.”
यावर्षी जमलेल्या राख्या पठाणकोट (पंजाब) येथील भारतीय वायूसेनेच्या हवाई तळावरील जवानांना तसेच मुंबई येथील सशस्त्र सेना सामान चिकित्सा डेपो कार्यालयात रवाना करण्यात आल्या.

