( रत्नागिरी /प्रतिनिधी )
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा शाळेजवळील अवघड वळणावर 28 जुलै रोजी रात्री अकरा वाजता गॅस टँकर पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरु झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव, होम डीवायएसपी फडके मॅडम, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे तसेच ग्रामीण ठाण्यासह शहर पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गॅस गळतीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून आजूबाजूच्या नागरिकांना तातडीने स्थलांतरित करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त टँकरमधील गळती सध्या नियंत्रणात आली असून परिस्थिती आटोक्यात असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून हातखंबा तिठ्यावरून जाणाऱ्या सर्व वाहनांची वाहतूक हातखंबा तिठा येथे तत्काळ थांबविण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विवेक पाटील याठिकाणी नियोजन पाहत आहेत.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गांने जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हातखंबा ते लांजा मार्गासाठी कुवारबाव काजरघाटी जाण्याचा पर्याय उपलब्ध असून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बावनदी मार्गे वळवण्यात येत आहे. दरम्यान, हातखंबा- पाली मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे.