(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील तळवडे (बौद्धवाडी) येथील सचिन जाधव उर्फ बावा (वय ४२) या युवकाचा मृतदेह आज दुपारी अर्जुना नदीच्या काठी पुलाजवळ गौंड चिरफळीचा माळ परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सचिन जाधव हे शनिवार, १९ जुलै २०२५ पासून बेपत्ता होते. त्यांचा शोध स्थानिक ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडून सुरू होता. मात्र, त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नव्हता. त्यामुळे त्यांची बहीण गौतमी नंदकुमार कांबळे (रा. जुगाई, येळवण) यांनी रायपाटण पोलीस दूरक्षेत्रात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असतानाच आज दुपारी अर्जुना नदीवरील पुलाजवळील वडचाआई मंदिर परिसरात एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सदर मृतदेह पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील घाडगे आणि रामदास पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने नदीतून बाहेर काढला. मृताच्या हातावर “बावा” हे नाव गोंदलेले आढळल्याने ओळख पटवण्यास मदत झाली.
यानंतर रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंदरीकर व त्यांच्या टीमने घटनास्थळी येऊन मृतदेहाचे प्राथमिक पोस्टमॉर्टेम केले. या प्रकरणाचा पुढील तपास रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी कमलाकर पाटील करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अपघात, आत्महत्या की घातपात याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.