(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वरपासून काही अंतरावर असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओझरखोल येथे डायवर्शनच्या ठिकाणी मोठा खड्डा पडला असून, त्यामुळे अपघाताचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एसटी बस आणि मिनी बसमध्ये भीषण अपघात झाला होता. या घटनेनंतर जाग आलेल्या ठेकेदाराने तातडीने डायवर्शन रस्ता तयार केला, मात्र तो देखील निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर येत आहे.
त्यावेळच्या अपघातात मिनी बस चालक किरण रहाटे कॅबिनमध्ये अडकून पडले होते. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तब्बल तासभर प्रयत्न करून त्यांना बाहेर काढले. या अपघातात १६ प्रवासी जखमी झाले होते. घटनास्थळी वळण मार्ग व दिशादर्शक फलक नसल्यामुळे एसटी बस चुकीच्या दिशेने गेली आणि अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. त्यानंतर ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संतप्त जमावाने रोष व्यक्त करत ठेकेदाराच्या नावाने जोरदार संताप व्यक्त केला.
अपघातानंतर ठेकेदाराला ‘अक्कल’
अपघात घडल्यानंतर ठेकेदाराने काही प्रमाणात सुधारणा केली. अपघातस्थळाजवळील नादुरुस्त वळण दुरुस्त करून दिशादर्शक फलक लावण्यात आले. मात्र, ही सुधारणा केवळ वरवरची असल्याचे दोन दिवसांतच उघड झाले. वळण रस्त्यावर टाकलेली खडी पावसामुळे विस्कळीत झाली असून, रस्त्यावर मोठा खड्डा पडून त्यात पाणी साचले आहे. परिणामी, वाहनचालक गोंधळून जाऊन अपघाताच्या घटनांना सामोरे जात आहेत.
दोन दिवसांतच वळण रस्त्याची दुर्दशा; अपघातांना खुले आमंत्रण
एसटी आणि मिनी बस अपघाताच्या अवघ्या चौथ्या दिवशी, त्याच भागात स्विफ्ट कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. रस्त्याची स्थिती पाहून नेमका रस्ता आहे की पाण्याचे तळे, असा संभ्रम निर्माण होत आहे. अशा संभ्रमात सापडलेल्या स्विफ्ट चालकाने चुकीच्या दिशेने गाडी नेल्यामुळे अपघात झाला, असे बोलले जात आहे.
ठेका रस्त्याचा की जनतेच्या जीवाशी खेळण्याचा?
तळेकांटे ते आरवली दरम्यान सुरु असलेल्या महामार्गाच्या कामांबाबत सातत्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठेकेदाराच्या मनमानी आणि कामातील निकृष्टपणा याबाबत नागरिक ओरड करत असूनही संबंधित प्रशासन डोळस असूनही डोळेझाक करत आहे. यामुळे फक्त ठेकेदारालाच नव्हे, तर त्याच्या पाठिशी उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरावे लागेल, अशी जनभावना आहे