(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मौजे सोमेश्वर (ता. रत्नागिरी) येथील मांडवकर वाडी रस्त्यालगत असलेल्या श्री समीर सुभाष भातडे यांच्या आंबा कलम बागेतील कुंपणावर लावलेल्या नायलॉनच्या जाळीत एक दुर्मिळ खवले मांजर (पँगोलिन) अडकले असल्याची दि. २१ जुलै २०२५ रोजी माहिती वन्यप्राणी व निसर्गप्रेमी रोहन वारेकर यांना मिळाली. त्यांनी वेळ न दवडता तत्काळ वनविभागाशी संपर्क साधत घटनास्थळी धाव घेतली.
निदर्शनात आलेले खवले मांजर नायलॉनच्या जाळ्यात आणि चिखलात खोलवर अडकले होते. वनविभागाचे वनपाल श्री न्हानू गावडे, वनरक्षक सौ. शर्वरी कदम (जाकादेवी), तसेच प्राणीमित्र महेश धोत्रे यांच्या मदतीने अतिशय काळजीपूर्वक रेस्क्यू ऑपरेशन राबवून या वन्यप्राण्याची सुखरूप सुटका करण्यात आली. नंतर पशुवैद्यकीय अधिकारी, रत्नागिरी यांच्याकडून खवले मांजराची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर प्राणी पूर्णतः स्वस्थ असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात पुन्हा सोडण्यात आले.
ही कार्यवाही विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कामगिरीत श्री प्रकाश सुतार व परीक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
वन्यप्राणी अडचणीत दिसल्यास तात्काळ कळवा
वन्यप्राणी अडकल्याची किंवा अपघातग्रस्त स्थिती दिसल्यास तात्काळ वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.