(पुणे)
राज्यभरात खळबळ उडवलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिच्या पतीसह कुटुंबातील सदस्य आणि इतर मिळून एकूण ११ आरोपींविरोधात सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात १६७० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. केवळ ५८ दिवसांत हे विस्तृत आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती बावधन पोलिसांनी दिली असून, सर्व आरोपींविरोधात ठोस पुरावे संकलित केल्याचा दावा करण्यात आला आहे. सरकार पक्षाच्यावतीने बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१६ मे रोजी वैष्णवी शशांक हगवणे (वय २४, रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम, मुळशी) हिने हुंडा आणि जमीन खरेदीसाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूनंतर पती शशांक हगवणे (२७), सासरे राजेंद्र हगवणे (६३), सासू लता हगवणे (५४), नणंद करिश्मा हगवणे (३१) आणि दीर सुशील हगवणे (२७) या पाच जणांविरोधात गंभीर आरोप झाले होते.
याशिवाय, वैष्णवीच्या बाळाचा बेकायदा ताबा घेणे व तिच्या नातेवाइकांना पिस्तुल दाखवून धमकावल्याच्या आरोपावरून निलेश चव्हाण (३५, रा. कर्वेनगर) याचाही समावेश आरोपींत करण्यात आला आहे. तसेच, आत्महत्येनंतर फरार झालेल्या राजेंद्र व सुशील हगवणेला मदत करून आश्रय दिल्याप्रकरणी प्रीतम वीरकुमार पाटील (४७, रा. कोनगोळी, बेळगाव), मोहन उर्फ बंडू भेगडे (५९), बंडू फाटक (५५), अमोल जाधव (३५) आणि राहुल जाधव (४५) यांच्याविरोधातही आरोपपत्रात स्थान देण्यात आले आहे.
पाच जणांना पूर्वीच जामीन मंजूर
आरोपींना आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांना (पाटील, भेगडे, फाटक, अमोल व राहुल जाधव) न्यायालयाने आधीच जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, हे गुन्हे जामीनपात्र असूनही या आरोपींना अटक करून पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. त्यामुळे न्यायालयाने बावधन पोलिसांना ताशेरे ओढले होते.
लता, करिश्मा आणि निलेशच्या जामीन अर्जावर सुनावणी
सध्या सहा आरोपी न्यायालयीन कोठडीत असून त्यापैकी लता हगवणे, करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण यांनी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. निलेश चव्हाणच्या अर्जावर आज (मंगळवारी) सुनावणी होणार आहे, तर लता आणि करिश्माच्या अर्जांवर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. जामीन अर्जांवरील सुनावणीनंतर सर्व आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात येणार असून, त्यानंतर मुख्य खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

