(मुंबई)
सध्या अस्तित्वात असलेली ई-बालभारतीची इमारत लोड-बेअरिंग स्ट्रक्चरमध्ये बांधलेली आहे. स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार ही इमारत अत्यंत कमकुवत झाली असून, तिच्या जागी नव्या इमारतीचे बांधकाम करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही इमारत पाडून त्याच ठिकाणी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव लवकरच नियामक मंडळासमोर मांडण्यात येणार असून, मंजुरी मिळाल्यानंतर बांधकाम कार्य सुरू करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.
पुणे येथील बालभारती कार्यालयाची इमारत जुनी झाल्याने तिच्या पुनर्बांधणीबाबत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना डॉ. भोयर बोलत होते. या चर्चेत सदस्य जगन्नाथ अभ्यंकर, विक्रम काळे आणि किशोर दराडे यांनीही सहभाग घेतला.
डॉ. भोयर म्हणाले, “बालभारतीची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी झाली. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शासनमान्य अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके याच ठिकाणी छापली जातात आणि ती संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित केली जातात. मात्र, मुख्य इमारत नव्हे तर जुनी बालचित्रवाणी अर्थात आताची ई-बालभारतीची इमारत कमकुवत झाल्यामुळे तिची तातडीने पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.”
दरम्यान, ‘एससीईआरटी’ व ‘एनसीईआरटी’ अभ्यासक्रमासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केले की, “राज्य शासनाच्या धोरणानुसार स्थानिक गरजांनुसार अभ्यासक्रम तयार केला जाईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने तयार केलेल्या वर्कबुक्सचा अधिकाधिक उपयोग करण्यावर भर दिला जाईल.”
याशिवाय “मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना” सादर करताना डॉ. भोयर म्हणाले की, राज्यभरातून वापरलेली पुस्तके आणि वह्या गोळा करून त्यांचा पुनर्वापर केला जाईल. त्यातून तयार केलेल्या वह्या आणि पुस्तके विद्यार्थ्यांना कमी दरात उपलब्ध करून दिली जातील. तसेच ज्या ठिकाणी बालभारतीच्या मालकीच्या जागा आहेत, तिथे आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी नमूद केले.