( खेड/ प्रतिनिधी )
तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी येथे पुराच्या पाण्यामुळे मानवी वस्तीत घुसलेल्या सुमारे चार फूट लांबीच्या मगरीला वनविभाग आणि छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने यशस्वीरित्या पकडून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. या कामगिरीत वनविभागाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीतील मगरींच्या हालचाली वाढल्या असून, त्या मानवी वस्तीकडे वळत आहेत. १७ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास प्रभुवाडीतील नागरिकांना गावाच्या हद्दीत एका मगरीचे अस्तित्व जाणवले. ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधत माहिती दिली. वनविभागाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या सदस्यांसह वनकर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करत मगरीला सुरक्षितरीत्या पकडले. वैद्यकीय तपासणीनंतर तिला पुन्हा तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या मोहिमेत फाउंडेशनचे सुरज जाधव, सर्वेश पवार, श्वेत चोगले, रोहन खेडेकर आणि वनविभागाचे अधिकारी सहभागी होते. संपूर्ण कारवाई रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या प्रकारातून वनविभागाच्या दक्षतेची आणि जबाबदारीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. नागरिकांनीही वन्यजीव दिसल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.