(चिपळूण)
कोकणातील रेल्वे प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी बुधवारी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीचे आयोजन आमदार भास्कर जाधव यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.
या बैठकीत आमदार जाधव यांनी कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ठोस मागण्या मांडल्या. दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करणे, पनवेल-चिपळूण दरम्यान नव्या गाडीची मागणी आणि रत्नागिरी तसेच चिपळूण येथे रेल्वे आरक्षण कोटा वाढवण्याची आवश्यकता यासारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा त्यांनी ठपका ठेवला. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, संबंधित प्रस्तावांना रेल्वे बोर्डाकडून मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
या बैठकीमुळे कोकणातील हजारो रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सुटण्याची नवी आशा निर्माण झाली आहे. आमदार भास्कर जाधव यांच्या सक्रीय पाठपुराव्यामुळे ही बैठक फलदायी ठरली असून, प्रवाशांच्या हितासाठी ते पुढेही सातत्याने प्रयत्नशील राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. याआधीही आमदार जाधव यांनी विधानसभेत कोकण रेल्वे संदर्भातील प्रश्न उपस्थित करत राज्य शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या प्रयत्नामुळे कोकणवासीयांच्या मागण्या अधिक ठामपणे केंद्र सरकारपुढे मांडल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.