(पंढरपूर)
आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेकरिता एसटी महामंडळाच्या 5200 विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेससोबत येणाऱ्या चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच मार्गदर्शन करणारे अधिकारी आणि पर्यवेक्षक यांच्यासाठी मोफत चहा, नाश्ता आणि जेवण यांची सोय करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
“सेवाभावी भावना म्हणून उपक्रम” – प्रताप सरनाईक
मंत्री सरनाईक म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ आणि त्याचे कर्मचारी आषाढी वारीमध्ये भाविकांची निष्ठेने सेवा करत आहेत. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता ते आपले कर्तव्य पार पाडतात. त्यांची सेवा आणि समर्पण वाखाणण्याजोगे आहे.” “यंदा, मी स्वतःच्या खर्चातून या कर्मचाऱ्यांसाठी सलग तीन दिवस – ५, ६ आणि ७ जुलै रोजी चहा, नाश्ता आणि उपवासासाठी योग्य भोजनाची मोफत व्यवस्था करत आहे. हे माझ्यासाठी सामाजिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून ‘विठुरायाची सेवा’ करण्याची संधी आहे. हे पुण्य पैशातून मोजता येत नाही. म्हणूनच हा उपक्रम मी दरवर्षी राबवणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
चार प्रमुख बसस्थानकांवर भोजन व्यवस्था
या सेवाभावी उपक्रमांतर्गत पंढरपूरमधील चंद्रभागा, भिमा, विठ्ठल आणि पांडुरंग या प्रमुख बसस्थानकांवर भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. या ठिकाणी सुमारे १३,००० एसटी कर्मचारी या मोफत भोजनसेवेचा लाभ घेणार आहेत. परिवहन विभागाच्या या उपक्रमामुळे आषाढी वारीच्या काळात भाविकांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावेल, तसेच एसटी महामंडळाची सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची भूमिका अधोरेखित होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

