(रत्नागिरी)
रत्नागिरीतील कोळंबे गावात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय, दापोलीच्या चतुर्थ वर्षातील “मृदासूत” या विद्यार्थ्यांच्या गटामार्फत ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राची स्थापना करण्यात आली.
या माहिती केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शिवकुमार सदाफुले आणि ग्रामपंचायत कोळंबेचे सरपंच श्री. प्रशांत पाटील यांच्या हस्ते केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमास आत्मा प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री. विजय बेटिवर, जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य) – जिल्हा परिषद रत्नागिरी श्री. विजय मुळे, वर्तुळ कृषि अधिकारी (पावस) श्री. सागर मिसाळ, कृषि विकास अधिकारी (पंचायत समिती, रत्नागिरी) श्री. गडदे, ग्रामपंचायत कोळंबेचे उपसरपंच श्री. रवींद्र भताडे, सहाय्यक कृषि अधिकारी श्री. दीपक काळे तसेच अनेक स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या केंद्रामार्फत कोकणातील शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेती विषयक महत्त्वाची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे. केंद्रात सुधारित वाण, सेंद्रिय शेती, कीड व रोग व्यवस्थापन, खत नियोजन, जैविक खते व नियंत्रक, हवामान अंदाज, कृषी विद्यापीठाची प्रकाशने आणि विविध कृषी योजना यांची माहिती देण्यात आली आहे.
स्थानिक शेतकरी श्री. प्रशांत फडणीस आणि श्री. अजित हातिसकर यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. प्रमुख पाहुण्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, “असे उपक्रम ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात,” असा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांनी या माहिती केंद्राचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.
या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालय, दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्येचे केंद्रप्रमुख डॉ. किरण मालशे, विषय विशेषज्ञ डॉ. रंजीत महाडिक, आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या केंद्राच्या स्थापनेत “मृदासूत” गटातील विद्यार्थी प्रणव देसाई, विजय दराडे, विपुल डोंगरकर, ओंकार फराडे, राजवर्धन गायकवाड, सुमित भादवे, वेदांत गिरी, सार्थक दिवाळे, आकाश गावडे आणि संकेत देशपांडे यांचा सक्रीय सहभाग होता.
कोळंबे गावातील हा स्तुत्य उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. “मृदासूत” गटामार्फत आगामी चार महिन्यांत आधुनिक कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध उपक्रम आणि प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे.