(नाशिक / प्रतिनिधी)
भगवान श्रीकृष्णाच्या पुण्यभूमीत मथुरा येथे श्रीमद् भागवत सप्ताह करणारे सारे सेवेकरी खरोखर पुण्यवान आणि भाग्यवान आहेत. भागवतामध्ये जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे सेवेकर्यांनी केवळ पठण करून थांबू नये तर भागवत आपल्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणावा असे मौलिक विचार गुरुपुत्र श्री आबासाहेब मोरे यांनी मांडले.
मथुरा येथे सेवामार्गातर्फे भागवत सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी गुरुपुत्र श्री. आबासाहेब मोरे यांचा सत्संग मोठ्या उत्साहात पार पाडला. त्यावेळी त्यांनी भागवताचे माहात्म्य सांगितले. ते म्हणाले की, भागवतात नाम आणि संगतीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आपण सतत भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे.मात्र त्याउलट आपण वागत असतो. एखाद्याचा द्वेष करून त्या व्यक्तीचे सतत स्मरण ठेवतो. आपण संपूर्ण जीवनात भगवंताचे स्मरण ठेवले तर अखेरच्या क्षणी देखील भगवंतच आपल्या स्मरणात राहील आणि आपला पुढचा प्रवास सुखकर होईल. त्यामुळे नामाशिवाय तरणोपाय नाही.
आपल्या विचारात, अंतःकरणात सतत परमेश्वराचे स्मरण ठेवायला हवे. त्यामुळे भौतिक गोष्टींची इच्छा देखील कमी होत जाते, कारण जीवनाच्या अखेरपर्यंत भौतिक गोष्टींचा हव्यास काही कमी होत नाही. एखादी इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी इच्छा परमेश्वराने पूर्ण करावी यासाठी आपण प्रयत्न करतो. भागवत पारायण केल्यानंतर इथून जाताना एक संकल्प आपण जरूर करावा की, यापुढे कोणत्याही गोष्टीचा हव्यास आपण करणार नाही. जे आहे त्यामध्ये समाधान मानू. विशेष म्हणजे परमेश्वराची सेवा करताना सुख सुविधांकडे पाहण्याऐवजी आहे त्या परिस्थितीत सेवा रुजू करावी, म्हणजे ती सेवा परमेश्वराला अधिक प्रिय होते असा उपदेश त्यांनी केला.
सेवेला भक्ती आणि श्रद्धेची जोड हवी..
कोणत्याही सेवेला भक्ती आणि श्रद्धेची जोड असेल तर ती सेवा फलश्रुत होते. अन्यथा कितीही मोठ्या सेवा करा त्याचा काहीही उपयोग होत नाही. भक्ती आणि श्रद्धा निर्माण होण्यासाठी आधी आपण भक्त बनले पाहिजे. त्याकरिता जीवनात एकदा तरी भागवताचे पठण करून भागवताचे सार लक्षात घेतले पाहिजे. भागवतात भक्ती मार्गाला प्राधान्य देण्यात आले आहे. भागवतामुळे भक्ती वृद्धिंगत होते असे विवेचन श्री आबासाहेब मोरे यांनी केले.
संतान गोपाळ मंत्रानुष्ठान व श्रीकृष्ण दोलोत्सव..
सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे उत्साहात वाचन झाले आणि दुपार सत्रात निरूपणानंतर श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त सुयोग्य संतानप्राप्तीकारक श्री संतान गोपाळ मंत्रानुष्ठान आणि श्रीकृष्ण दोलोत्सव अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. उद्या ३० जून रोजी कन्याविवाहकारक श्री कात्यायनी पूजन व मंत्रानुष्ठान तसेच गिरीराज गोवर्धन पूजन व अन्नकूट हा उपक्रम घेण्यात येणार आहे.