( दापोली )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आणि वाढलेल्या समुद्राच्या लाटांमुळे दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडी परिसरात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. खाडीकिनारी नादुरुस्त अवस्थेत पडून असलेल्या बोटींना समुद्राच्या लाटा इतक्या जोरात लागल्या की त्या थेट किनाऱ्यालगतच्या इरफानिया जुईकर मोहल्ल्यातील वस्तीत घुसल्या. या प्रकारामुळे परिसरातील घरांचे मोठे नुकसान झाले असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून या भागात समुद्राला जोरदार उधाण असून, त्याचा सर्वाधिक फटका आंजर्ले खाडी परिसराला बसला आहे. बुधवारी खाडीकिनारी अडखळ येथे ठेवण्यात आलेल्या काही नादुरुस्त बोटी समुद्राच्या भरतीच्या लाटा ओढून घेऊन गेल्या आणि त्या थेट इरफानिया जुईकर मोहल्ल्यातील लोकवस्तीमध्ये धडकल्या. या लाटांच्या प्रवाहामुळे पाण्याचा मारा इतका जबरदस्त होता की, खाडी किनाऱ्यालगत असलेल्या सुमारे ८०० ते ९०० मीटर लांबीच्या पट्ट्यात पाणी शिरले. यामुळे घरांच्या शेजारील संरक्षण भिंती आणि घरांच्या भिंतीही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्या आहेत.
घटनास्थळी पोहोचलेल्या मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी पंचनामा करून वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. समुद्राच्या लाटांमुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांचे जगणे अधिक कठीण झाले आहे.