(रत्नागिरी)
रत्नागिरीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जागेत उभारण्यात येणारे बौद्धविहार हे केवळ जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण ठरेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला. “हे बौद्धविहार देशातील सर्वोत्कृष्ट व्हावे, असे प्रयत्न करण्यात येणार असून, सर्व नागरिकांना अभिमान वाटेल असे हे तीर्थक्षेत्र होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात काल आढावा बैठक पार पडली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्र्यांनी सांगितले की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जागेवर बौद्धविहाराचे बांधकाम करण्यात येणार असून, हे विहार सर्व धर्मीय नागरिकांमध्ये समरसता, शांतता व बंधुभावाचा संदेश देणारे असेल. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून, सर्व पक्ष व समाज घटकांच्या विश्वासात घेऊन व्यवस्थापन समितीची स्थापना केली जाईल. या समितीच्या माध्यमातून पुढील सर्व कार्यवाही नगरपरिषदेकडून करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.