( संगमेश्वर / मनोज जाधव )
बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर आणि माता रमाई यांच्या क्रांतिकारी विचारांचा वसा आपल्या प्रगल्भ लेखणीच्या माध्यमातून जपणारे, जलसाच्या माध्यमातून धम्मप्रसाराचे कार्य निष्ठेने करणारे संगमेश्वर तालुक्यातील सायले गावचे दिग्गज कवी, लेखक, गायक आणि दिग्दर्शक पांडुरंग शांताराम कदम यांचे सोमवार, दिनांक २३ जून २०२५ रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
कवी पांडुरंग कदम हे अल्पशिक्षित असले तरी त्यांची बुद्धिमत्ता तीव्र, विचार प्रगल्भ आणि प्रतिभा अफाट होती. त्यांच्या लेखणीतून साकारलेली क्रांतिकारी गीते, तसेच हृदयस्पर्शी कौटुंबिक नाटके आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.
त्यांचा पहाडी आवाज, त्यातील ललकारी, ती खास लकब आणि साद ऐकणाऱ्याच्या मनाला मंत्रमुग्ध करणारी होती. आज तो स्वर काळाच्या पडद्याआड गेला… आणि तो आवाज पुन्हा ऐकायला मिळणार नाही, याची जाणीव व्यथित करणारी आहे.
पांडुरंग कदम यांचा मायाळू, प्रेमळ आणि मनमिळावू स्वभाव होता. त्यांनी महाराष्ट्रभरातील अनेक कवी, लेखक, आणि जलसाकारांशी स्नेहसंबंध प्रस्थापित केले. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात त्यांच्या लेखनशैलीचे असंख्य चाहते आहेत.
सायले गावाच्या नावाला राज्यस्तरीय ओळख मिळवून देणाऱ्या या बहुगुणी व्यक्तिमत्त्वाने संगमेश्वर तालुक्याचेही नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या साहित्य आणि सांस्कृतिक कार्याच्या गौरवार्थ, विश्व समता कलामंच, लोवळे-संगमेश्वर या संस्थेने त्यांना राज्यस्तरीय “विश्व समता धम्मभूषण पुरस्कार” प्रदान केला होता.
एक कुशल व्यक्ती, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी कलावंत म्हणून त्यांनी अनेक नवोदित कवी, लेखक व जलसाकारांना घडविले. त्यांचे योगदान केवळ एका कलावंतापुरते मर्यादित नव्हते, तर ते परिवर्तनवादी चळवळीचेही एक महत्त्वाचे शिल्पकार होते.
सायले गावातील जलसा गेली अनेक वर्षे सलग सुरु होता. काही कारणांनी त्यात खंड पडला होता. मात्र त्या सांस्कृतिक उपक्रमास नव्याने उभारी देण्यासाठी पांडुरंग कदम यांनी सर्व कलावंतांना एकत्र करून जलसा पुन्हा सुरू केला – हे त्यांच्या नेतृत्वगुणाचे एक जिवंत उदाहरण आहे.
त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने संपूर्ण सांस्कृतिक व परिवर्तनवादी क्षेत्रात शोककळा पसरली आहे. “सायले गावाचा स्वर कठंमणी” आता या जगात राहिला नाही, पण त्यांच्या कार्याचे सूर, त्यांचे शब्द आणि आवाज काळाच्या प्रवाहात अमर राहतील.
पांडुरंग कदम यांना तमाम परिवर्तनवादी कवी, लेखक व जलसाकारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.