(दापोली)
बदलत्या शैक्षणिक प्रणालीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी काळानुरूप स्वत:मध्ये आवश्यक बदल करावेत आणि शिक्षण केंद्राच्या गुणवत्तेत वाढ होईल, यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रप्रमुख संजय जंगम यांनी केले. ते जि.प. शाळा शिवाजीनगर-साखळोली येथे कोळबांद्रे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते.
परिषदेची सुरुवात शाळेतील विद्यार्थिनींच्या सुस्वर ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. यास संगीतात साथ संजय जंगम व महेश शिंदे यांनी दिली.
या परिषदेत “पायाभूत जीवन कौशल्य विकास – काळाची गरज” या विषयावर मंगेश कडवईकर यांनी, इयत्ता पहिलीच्या भाषिक अध्ययन निष्पत्ती या विषयावर समीर ठसाळ यांनी, केंद्रस्तरीय शिक्षक समूहाचे महत्त्व यावर मनोहर सनवारे यांनी आणि मासिक पाळी व आरोग्य याविषयी नेहा उकसकर यांनी सखोल मार्गदर्शन केले.
नेहा उकसकर म्हणाल्या की, “मासिक पाळी ही चांगल्या आरोग्याचे लक्षण असून, स्वच्छता आणि योग्य काळजी यांची सवय किशोरवयीन मुलींमध्ये रुजवणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना सात्विक आधार देणेही गरजेचे आहे.”
शिक्षक समीर ठसाळ यांनी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांचे स्पष्टीकरण देताना सांगितले, “अभ्यासक्रम हे उद्दिष्ट असून, ते साध्य करण्यासाठी पाठ्यपुस्तक हे केवळ एक साधन आहे. अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी कोणतेही प्रभावी साधन वापरले जाऊ शकते.”
या वेळी विविध प्रशासकीय कामकाज, गणवेश, पाठ्यपुस्तके इत्यादी बाबींचा आढावा घेत, केंद्राच्या व्यवस्थापन व गुणवत्तावाढीच्या दिशेने सखोल चर्चा करण्यात आली. परिषदेची सांगता यशस्वीरित्या पार पडली.
कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक महेंद्र कलमकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विलास सकपाळ यांनी केले. या प्रसंगी संजय जंगम, संजय मेहता, शामराव वरेकर, मनोहर सनवारे, महेंद्र कलमकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.