(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयातील जप्तीची कारवाई न्यायालयाच्या आदेशामुळे सध्या तरी थांबली असून, या स्थगितीस २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बुधवारी जिल्हा न्यायालयात यासंदर्भात झालेल्या सुनावणीत ही मुदतवाढ मंजूर करण्यात आली.
यापूर्वी जिल्हा न्यायालयाने २५ जूनपर्यंत जप्ती स्थगिती दिली होती. त्याआधी, ४ एप्रिल २०२५ रोजी, जिल्हा प्रशासनाने ही स्थगिती तातडीने मिळवली होती. दरम्यान, रत्नसागर रिसॉर्टचे मालक प्रतापसिंह सावंत यांनी प्रशासनाविरुद्ध नुकसानभरपाईची मागणी करत जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मे २०२१ मध्ये जिल्हा प्रशासनाने रिसॉर्ट मुदतीआधीच बंद केल्याने त्यांना ९ कोटी २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला होता.
या प्रकरणी न्यायालयाने सावंत यांच्याच्या बाजूने निर्णय देत नुकसानभरपाईसंदर्भात आदेश दिला होता. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाई न दिल्यास त्यांच्या कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्याचा आदेश देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर, ४ एप्रिल रोजी कोर्टाचे दोन कर्मचारी आणि तक्रारदार सावंत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी काही खुर्च्या व संगणक बाहेर काढण्यात आले होते. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई झाली होती. या कारवाईला तत्काळ स्थगिती मिळवण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी ठरले. १६ एप्रिल, नंतर २५ जून आणि आता २३ जुलैपर्यंत ही स्थगिती वाढवण्यात आली आहे. पुढील सुनावणीत या प्रकरणाच्या अंतिम निर्णयाची दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे.