(संगमेश्वर / एजाज पटेल)
कुरधुंडा (ता. संगमेश्वर) येथे मुंबई-गोवा महामार्गालगतच्या संरक्षक भिंतीला तडे गेल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमधून समोर आले. त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रसारमाध्यमांनी यावर आवाज उठवत प्रशासन आणि ठेकेदारांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, या मागणीचा ‘उपाय’ म्हणून संबंधित यंत्रणांनी संरक्षक भिंतीलगतचा रस्ता “काम सुरू आहे” अशा फलकासह पूर्णतः बंद करून टाकला आहे. ही कारवाई प्रश्न सोडवण्याऐवजी त्यावर पांघरुण घालणारी ठरते की काय, असा सवाल नागरिक करत आहेत.
लाखो रुपये खर्च, पण दर्जाचा पत्ताच नाही!
विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च करून जेव्हा अशा निकृष्ट दर्जाची कामे केली जातात, तेव्हा “गुणवत्तेवर भाष्य न केलेलेच बरे” असे म्हणण्याची वेळ येते. प्रशासन आणि ठेकेदार यांच्या संगनमतातून जनतेची फसवणूक होत आहे, असा आरोप स्थानिक करत आहेत.
“ना खाऊंगा, ना खाने दूंगा” का फक्त भाषणातच?
देशाचे पंतप्रधान भ्रष्टाचाराविरोधात जोरदार भाष्य करतात, परंतु “इथे तर सगळेच पंगतीला बसल्याचे” चित्र दिसत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष, लोकप्रतिनिधींचे मौन आणि ठेकेदारांचे बेफिकीर काम — यामुळे सामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. इतका गंभीर मुद्दा समोर असूनही राजकीय पातळीवर याबाबत कुठलीही चर्चा नाही, चौकशी नाही!
नागरिकांचे जीवन विस्कळीत
हा रस्ता केवळ वाहतुकीसाठीच नाही, तर धार्मिक आणि कृषी दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. याच मार्गाने मुस्लिम बांधव दर्ग्याकडे जात असतात आणि पुढील भागात शेतशिवार आहे. रस्ता बंद असल्याने नित्यनेमाने जाणाऱ्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विकासाच्या नावाखाली असा बेजबाबदारपणा सहन करावा लागतो ही दुर्दैवाची बाब आहे.
जबाबदारीची ढाल ठेकेदारांच्या बाजूने?
“तुला मी ओरडलो, तू रडल्यासारखं कर” — अशा कार्यपद्धतीने ठेकेदारांवर प्रशासकीय यंत्रणांचा वरदहस्त असल्याची जनतेची भावना आहे. प्रशासन, सत्ताधारी, आणि स्थानिक नेते एकतर मौन बाळगून आहेत किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत. पारदर्शकतेची ग्वाही देणारे सत्ताधारी अशा गंभीर प्रकरणावर चिडीचूप का?
अपघातापूर्वी सावधगिरी, की दिखावा?
संरक्षक भिंतीसमोर लावलेला फलक भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आहे की काम लांबणीवर टाकण्यासाठीचा बहाणा? हे स्पष्ट होत नाही. ठेकेदार शुभमुहूर्ताची वाट पाहत आहेत की प्रशासन जागे होण्याची? या कामावर देखरेख करणारे अधिकारी कोण आहेत आणि त्यांनी आजवर काय पाहणी केली? हा प्रश्नही उपस्थित राहतो.
जनता विचारते – नेमकं चाललंय काय?
मुंबई-गोवा महामार्गासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये अडथळे, ढिसाळ काम, अपूर्ण रचना आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम सातत्याने समोर येत आहे. हे केवळ अपव्यय नसून, जनतेच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. अशा कामांच्या चौकशीस विलंब का? दोषींवर कारवाई कधी?
विकासाचे गोडवे गाणाऱ्या व्यवस्थेला उत्तरदायित्वाची जाणीव करून देणे हीच पत्रकारितेची खरी भूमिका आहे. अन्यथा, दरवेळी जनता भरडली जाईल, आणि “काम सुरू आहे” या फलकामागे प्रश्न कायमचे दडपले जातील!