(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरानजीकच्या पेठकिल्ला परिसरातील भाटकरवाडा येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या दुचाकींना आग लावण्याच्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवार मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० दरम्यान अज्ञात व्यक्तीने तीन दुचाकींना आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेत फजल मिरकर, निहाल मुल्ला आणि इम्तियाज मिरकर यांच्या अनुक्रमे बुलेट, अँक्सेस आणि अँक्टिव्हा अशा तीन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. पहाटेच्या सुमारास रहिवाशांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलीस पथकासह त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पंचनामा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान केले आहे.
“दुचाकींना आग लावणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच आरोपींना अटक करून कठोर कारवाई केली जाईल,” असे पोलिस अधीक्षक बगाटे यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सकाळी भाटकरवाडा परिसरात रूट मार्च काढत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, ती वैयक्तिक वादातून घडलेली आहे की अन्य कोणतेही उद्दिष्ट होते, याचा तपास पोलीस करत आहेत.