(मुंबई)
राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राबवली जात असलेली इयत्ता अकरावी (Class XI) ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींमध्ये अडकली आहे. प्रवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये महाविद्यालयांचा कट-ऑफ दाखवला जात नसल्यामुळे, २७ जून रोजी जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी (First Merit List) आता ३० जूनपर्यंत लांबवली जाऊ शकते, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, लवकरच अकरावी प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचेही संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातील ९,४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २१ लाख २३ हजार ४० जागा उपलब्ध असून, त्यासाठी १२ लाख ७१ हजार २०१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यापैकी संस्थानिहाय कोटा व अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता उर्वरित सुमारे १२ लाख विद्यार्थ्यांसाठी २० लाखांहून अधिक जागांसाठी प्रवेश यादीची प्रतीक्षा आहे.
यापूर्वी शिक्षण विभागाने २७ जूनपासून कॉलेजनिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याच तारखेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, कोणत्याही मागणीशिवाय, आणि राज्यभर ही प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात राबवण्यास आवश्यक तांत्रिक तयारी न करता, केवळ अध्यादेशाद्वारे शिक्षण विभागाने ही प्रक्रिया सुरू केली, यावरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही अद्याप पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे “ही गोंधळलेली प्रवेश प्रक्रिया आणखी किती काळ सुरू राहणार?” असा प्रश्न विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्याही मनात निर्माण झाला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकांनुसार एकही टप्पा वेळेत पूर्ण होऊ शकलेला नाही. परिणामी, प्रवेशासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीला ही ऑनलाईन प्रक्रिया हाताळणे शक्य आहे का, यावरही शंका व्यक्त केली जात आहे. आता ३० जून रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेचे कायम लांबणीवर पडलेले वेळापत्रक
- यावर्षी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लवकर पार पडून अकरावीचे शैक्षणिक वर्ष लवकर सुरू व्हावे, यासाठी दहावी बोर्ड परीक्षा दोन आठवडे लवकर घेण्यात आली.
- दहावी बोर्ड परीक्षेचा निकालही दोन आठवडे लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेऊन 13 मे रोजी हा निकाल जाहीर केला.
- 13 मे रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर 19 मे रोजी राज्यभरातील ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. यामध्ये 21 मेपासून प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली.
- अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवेश प्रक्रिया राबवताना अडचणींना सामोरे जावं लागलं आणि 21 मे ऐवजी अर्ज भरण्याची तारीख पुढे ढकलून ती 26 मे करण्यात आली.
- या सगळ्या तांत्रिक अडचणींमुळे वेळापत्रकानुसार 3 जून रोजी जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी पुढे ढकलण्यात आली.
- त्यानंतर नवीन वेळापत्रक बनवण्यात आले आणि यामध्ये 10 जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले.
- यात अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरायचा राहिल्याने पुन्हा एकदा वाढीव वेळ विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी देण्यात आला. शिवाय इतर तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी वेळ घेऊन पहिली गुणवत्ता यादी थेट 26 जूनला जाहीर करण्याचा निर्णय घेतला.
- यामध्ये अल्पसंख्यांक संस्थांमधील आरक्षणाचा विषय आणि त्यातील गोंधळ समोर आल्यानंतर अल्पसंख्यांक संस्थांमध्ये आरक्षणाचा पूर्वीचा निर्णय अंमलात आणण्यात आला. त्यानुसार पुन्हा एकदा गुणवत्ता यादी जाहीर करण्यासाठी वेळ लागत असल्याची माहिती आहे.
- त्यामुळे आज वेळेत पहिली गुणवत्ता यादी जाहीर व्हावी, यासाठी शिक्षण संचालनालयाकडून जरी प्रयत्न केले जात असले तरी यादी जाहीर होणार की लांबणीवर पडणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.