(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दापोली तालुक्यातील गोरीवलेवाडी (कोंढे) येथे कुत्र्याच्या शौचास बसल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार वादावादी होऊन हाणामारी झाली. या घटनेत एका शेतकऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला, तर दुसऱ्या गटातील वृद्धास लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी दापोली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, एकूण सहा जणांविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही घटना २४ जून रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. प्रारंभीची तक्रार रुपेश वसंत गावडे (वय ३५) यांनी दाखल केली असून, त्यानुसार ते आपल्या घरासमोर साफसफाई करत असताना महादेव जानू रेवाळे यांचा कुत्रा त्यांच्या परिसरात शौचास बसलेला दिसला. गावडे यांनी कुत्र्याला हटकले असता रेवाळे यांनी संतापून त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. “तुझ्या बापाचा रस्ता आहे का?” अशा शब्दांत शिवीगाळ करत, रेवाळे यांनी हातातील धारदार सुऱ्याने गावडे यांच्या डाव्या हातावर दोन ठिकाणी वार केले, असा आरोप करण्यात आला आहे.
या हल्ल्यानंतर गावडे यांची पत्नी ऋतुजा गावडे, शेजारी स्मिता जयवंत राजीवले आणि अनुराग जयवंत राजीवले यांनी हस्तक्षेप केल्यावर त्यांनाही रेवाळे यांनी मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ११८/२०२५ अन्वये महादेव रेवाळे यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११८(२), ११५(२), ३५१(१), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याच प्रकरणात दुसरी बाजू मांडताना महादेव जानू रेवाळे (वय ५८) यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कुत्र्याच्या शौचप्रश्नी झालेल्या वादात रुपेश गावडे यांनी त्यांना डाव्या कानशिलात मारले, तसेच हातातील बांबूच्या जाड काठीने डोक्याच्या डाव्या बाजूस फटका मारला. त्यानंतर विठ्ठल बाबू राजीवले, जयवंत पांडुरंग राजीवले, अनुराग जयवंत राजीवले आणि दिलीप दशरथ करंजकर यांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप त्यांनी केला आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी गु.र.नं. ११९/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११८(१), १८१(२), १११(२), १९० प्रमाणे पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास दापोली पोलीस करत असून, पुढील चौकशी सुरू आहे.