(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या आदर्श मराठी शाळा सत्कोंडी व कांबळेलावगण ह्या दोन शाळा जिल्ह्यातील पहिल्या पर्यावरणवादी आनंददायी सौरशाळा ठरल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्या माध्यमातून पंचम एकात्मिक गावविकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील सत्कोंडी व कांबळेलावगण ह्या दोन जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ८ किलो वॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे अक्षय वीजनिर्मिती होऊन ह्या दोन्ही शाळांचे वीजबिल शून्य होणार आहे. आणि वापरापेक्षा अधिक निर्माण झालेली वीज आता महावितरणला विकली जाणार आहे.
सत्कोंडी येथील स्व. अनंतरावजी बैकर सामाजिक शैक्षणिक संकुलात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेसोबतच ग्रामपंचायत कार्यालय, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, अंगणवाडी, व्यायामशाळा, बहुउद्देशीय महिला उद्योग प्रशिक्षण सभागृह, विंधन विहिरी व वाॅटर एटीम एवढ्या आस्थापनाना तर कांबळेलावगण येथील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, विंधन विहिर व वाॅटर एटीम या आस्थापनाना याचा उपयोग होणार आहे.
सदर नाविन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेच्या संचालिका रेश्माताई सांबरे यांच्या शुभहस्ते कार्यान्वित करण्यात आला यावेळी सरपंच सतिश थुळ, प्रकल्प समन्वयक दत्ता गुरव, सहायक प्रकल्प समन्वयक चेतन वाघ, उपसरपंच चंद्रकांत मालप, सदस्य अरुण मोर्ये, अजय काताळे, प्रणाली मालप,समिक्षा घाटे, ममता बंडबे, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय बैकर, हेरिटेजचे संतोष कांबळे, पंचप्रमुख भाऊ काताळे, तंटामुक्ती अध्यक्ष केशव बलेकर, मुख्याध्यापक सुभाष पालये, सुशिल वासावे आदी उपस्थित होते.