(रत्नागिरी)
समृद्ध कोकण संघटनेने गुरुवारपासून स्वराज्यभूमी कोकण आंदोलनाला रत्नागिरीमध्ये सुरुवात केली. स्वायत्त कोकण परिषदेतील चर्चासत्रानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
समृद्ध कोकण संघटनेचे अध्यक्ष संजय यादवराव यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन विविध मागण्यांसाठी करण्यात येत असून, त्यामध्ये आंबा बागायतदार आणि मच्छिमारांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, या महत्त्वाच्या मागणीसह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाआधी समृद्ध कोकण संघटनेतर्फे हातखंबा ते साळवी स्टॉपपर्यंत रॅली काढली होती. यामध्ये ५० ते ६० कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.
रॅलीनंतर अंबर हॉल येथे स्वायत्त कोकण परिषद घेण्यात आली. या परिषदेमध्ये कोकणच्या विकासाबाबत विविध विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. त्यामध्ये पर्यटन, आंबा बागायतदार, शेती, मच्छिमार, तरुण तसेच कोकणावर होणाऱ्या अन्यायावर चर्चा करण्यात आली.
चर्चासत्रानंतर मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय पदयात्रा काढण्यात आली व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले. यात यादवराव यांच्यासह राजू भाटलेकर, प्रकाश साळवी, संदीप शिरधनकर व अन्य सहभागी झाले आहेत.