(जैतापूर / वार्ताहर)
साखरी-नाटे येथील हुना मास्तर रोडवर आज (बुधवारी) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना घडली. मत्स्य व्यवसाय अभ्यास करणारी विद्यार्थिनी शाहीन उमीद गडकरी शाळेत जात असताना नाटे सडापेठ भागातील लोहार दुकान ते अस्मिता पतपेढी या रस्त्यावर अचानक ९ ते १० भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर झडप घातली.
कुत्र्यांनी तिला वेढा घालत चावा घेण्याचा प्रयत्न केला. घाबरलेली शाहीन धावत सुटली. सुदैवाने, तिथे उपस्थित असलेल्या अंगणवाडी सेविका बाणे मॅडम यांनी प्रसंगावधान राखत छत्रीचा वापर करत कुत्र्यांवर प्रहार केला. त्याचवेळी परिसरातील काही महिलांनी धाव घेत तिला मदत केली आणि तिला सुरक्षितपणे त्या धोक्यातून बाहेर काढले.
ही घटना केवळ एका विद्यार्थिनीपुरती मर्यादित नाही. साखरी-नाटे परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचे टोळके सर्रास रस्त्यावर फिरताना दिसत आहेत, त्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि सर्वसामान्य जनतेची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
नागरिकांनी याआधीही ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रारी करून भटक्या कुत्र्यांचा त्रास सांगितला होता. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यानेच आज अशा धोकादायक घटनेची पुनरावृत्ती झाली आहे, असा आरोप स्थानिकांनी केला.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुढील उपाययोजना आवश्यक
1. पालकांनी लहान मुलांना शाळेत पाठवताना शक्यतो त्यांच्या सोबत एक जबाबदार व्यक्ती पाठवावी.
2. शाळा प्रशासनाने ये-जा वेळेस विशेष लक्ष द्यावे.
3. ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
4. आवश्यक असल्यास प्राणीमित्र संस्थांची मदत घेऊन निर्जंतुकीकरण वा पुनर्वसन मोहीम राबवावी.
“उद्या मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी कृती करा!”
गंभीर घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी वेळेवर कठोर आणि प्रभावी पावले उचलणे आवश्यक आहे. सध्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, “प्रशासनाने आता तरी जागे होऊन ठोस पावले उचलावीत,” अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.