(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेल्या विकासकामांची स्थिती पाहता, या भागाच्या दुरवस्थेला कोणी वाली उरला आहे का? असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. संगमेश्वर शास्त्री पुलाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील सिमेंट काँक्रीट रस्ता खचून
मोठे तडे पडले आहेत. संबंधित विभागाच्या देखरेखीखाली ठेकेदाराने केवळ नावापुरते काम केल्याचे स्पष्ट होत असून, निसर्गाच्या पहिल्याच परीक्षेत या निकृष्ट कामाची पोलखोल झाली आहे.
या घटनेनंतर जनतेने आवाज उठवताच ठेकेदाराने वाहतूक थांबवून मलमपट्टी सुरू केली. मात्र ही मलमपट्टीही केवळ तात्पुरती—काँक्रीट, वाळू व खडी टाकून वरवरचे थर तयार करण्यात आले आहेत. खरेतर हे तडे व दर्जाहीन आणि खराब कामाचा रस्ता कोणत्याही तज्ञ अभ्यासकाच्या नव्हे तर सामान्य नजरेनेही स्पष्ट दिसतो आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाचे पाणी या तड्यांमधून रस्त्याखाली झिरपत असून, भविष्यात रस्त्याच्या अधिक दुरवस्थेची नांदी ठरणार हे नक्की. या विकासकामाचे वास्तव पहिल्या पावसातच उघड झाले आहे. हे प्रशासकीय यंत्रणेला धक्का देणारे चित्र नव्हे, तर प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा जिवंत पुरावा आहे.
स्थानिक पत्रकारांनी याआधीही या भागातील बांधकामाच्या दर्जावर बोट ठेवले होते, परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे आता हा महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे का? असा संतप्त प्रश्न जनतेच्या मनात उठत आहे.
ठेकेदाराच्या बेजबाबदार कारभाराला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे छुपे पाठबळ असल्याचा आरोपही स्थानिकांकडून होतो आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधीं यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचेच हे परिणाम आहेत. आजची अनागोंदी आणि भ्रष्ट कारभार उद्याच्या मोठ्या अपघाताची नांदी ठरू नये, अशी लोकांची व्यथा आहे. जर वेळेवर योग्य निर्णय घेण्यात आले असते, तर ठेकेदारांची ही बेफिकीरी आणि निकृष्ट दर्जाची कामे कधीच थांबली असती, असे नागरिक ठामपणे सांगत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील हे “विकासकाम” पहिल्याच पावसात पुरते उघडे पडले असून, त्यावर चिरीमिरीच्या “वजनात” गप्प राहणाऱ्यांच्या नजरा आता जनतेपासून लपणार नाहीत आणि रोषापासूनही सुटू शकणार नाहीत. कारण जनतेच्या प्रश्नांकडे डोळेझाक करणाऱ्यांचे खरे चेहरे निसर्गाने पुन्हा समोर आणले आहेत. आता तरी जबाबदारी स्वीकारून दोषींवर कारवाई होणार की पुन्हा एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार, असा सवाल जागरूक नागरिक विचारत आहेत.