( चिपळूण )
करंबवणे खाडीकिनारी असलेल्या मिले-भिले खारभूमी विकास योजनेच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडल्याने ही योजना सध्या अडचणीत सापडली आहे. सुमारे ८३ लाख रुपयांचा निधी दोन वर्षांपूर्वीच मंजूर झालेला असतानाही कामे अपूर्ण राहिल्याने पावसाळ्यात शेतकरीवर्गाच्या चिंतेत भर पडली आहे.
समुद्राच्या भरतीतून शेतात शिरणारे खारे पाणी रोखण्यासाठी खाडीकिनारी मातीचा बंधारा बांधण्यात आला होता. सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या या बंधाऱ्यामुळे भिले येथील ८४ हेक्टर खाजण जमीन लागवडीसाठी उपयोगी ठरली होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या बंधाऱ्याच्या उघाडीतील दोषामुळे दरवर्षी पाणी शेतात शिरून नुकसान होत होते. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करत आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला.
यावर्षीच्या उन्हाळ्यात अखेर काम सुरू झाले असले तरी, उघाडीची झडपे न बसवता भरावाचे कामही अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात बंधाऱ्यावरील भराव वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा मार्ग बंद होण्याची शक्यता असून, शेती पाण्याखाली जाण्याचे संकट उभे ठाकले आहे.
“यावर्षी उघाडीचे काम पूर्ण होईल व दिलासा मिळेल असे वाटले होते. मात्र ठेकेदार आणि संबंधित खात्याच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फरपट होणार आहे. प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून कामे पूर्ण करावीत.”
– रमेश तलगे, शेतकरी, मिले (चिपळूण)