(देवरूख / सुरेश सप्रे)
मुरादपूर–मार्लेश्वर–कळकदरा रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करून त्यांचा योग्य मोबदला द्यावा, अशी ठाम मागणी १० गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे. ही मागणी प्रशासनाने धुडकावल्यास, १५ ऑगस्टपासून देवरूख तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
या संदर्भात सर्व पीडित शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ स्थानिक आमदार श्री. शेखर निकम यांची भेट घेऊन तातडीने तोडगा काढण्याची मागणी करणार आहे. शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, जमीन ताब्यात नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे टेंडर कसे काढले? भूसंपादनाच्या मागणीकडे दुर्लक्ष करून काम पुढे रेटले जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
जर शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि मोबदला न देता त्यांच्या जमिनीत काम सुरू झाले, तर “रस्त्यावर झोपून आंदोलन करू,” असा ठाम इशारा शेतकरी प्रतिनिधी शरद पवार आणि अशोक अणेराव यांनी दिला आहे.
आंगवली, मारळ, बामणोली, खडी कोळवण, ओझरे खुर्द, कासारकोळवण, निवे खुर्द, मुरादपूर आणि हातिव यांसारख्या गावांतील १६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकारी आणि आमदार यांना निवेदन देऊन, भूसंपादनाचा मोबदला दिल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करू नये, अशी मागणी केली होती.
मात्र, शेतकऱ्यांचा आरोप आहे की, प्रशासन लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांच्या दबावाखाली काम करत आहे. या शेकडो कोटी रुपयांच्या काँक्रिट रस्त्याचे काम आर. डी. सामंत कंपनीला देण्यात आले असून, आंगवली येथे काँक्रिट मिक्सिंग प्लांट उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. आमदार शेखर निकम यांची दिनांक २७ जून रोजी भेट निश्चित झाली असून, त्या दिवशी सर्व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ या विषयावर चर्चा करणार आहे.
“आम्हाला विकास हवा आहे, पण शेतकऱ्यांच्या पोटावर वरवंटा फिरवून जर तो होणार असेल, तर अशा विकासाला आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र विरोध करू,” असा स्पष्ट संदेश शेतकऱ्यांनी दिला आहे.