( चिपळूण )
कामथे येथील धरणात रात्रीच्या अंधारात औद्योगिक सांडपाणी सोडल्याच्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, ग्रामस्थांच्या रोषाला आता राजकीय रंग चढला आहे. गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीवर आरोप होत असून, या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण कार्यालयावर धडक देत संबंधित कंपनीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
युवा तालुका अधिकारी उमेश खताते यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कार्यालयात धाव घेतली. या वेळी “तीन दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल”, असा स्पष्ट इशारा खताते यांनी दिला. तसेच, सध्या पिण्याच्या पाण्याच्या संकटात सापडलेल्या कामथे व कापसाळ भागातील नागरिकांना तातडीने टँकरद्वारे स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचीही मागणी करण्यात आली.
दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कुलकर्णी यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले असून, प्राथमिक स्वरूपात धरण परिसरातील विहिरींमधून तसेच सांडपाण्याच्या स्त्रोतांमधून नमुने घेतले असल्याची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. संदर्भातील घटनेनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास एक टँकर कामथे धरणात पाइपच्या सहाय्याने सांडपाणी सोडताना आढळला. हा टँकर गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीचा असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. विशेष म्हणजे या कंपनीचे सांडपाणी पूर्वी माण-खटाव भागात पाठवले जात होते, मात्र यावेळी धरणातच मळी सोडण्याचा प्रयत्न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट आंदोलनाचा मार्ग पत्करला.
या प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांचीही भेट घेण्यात आली असून, टँकर चालक आणि संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात राम डिगे, संदेश भालेकर, संभाजी खेडेकर, भैया कदम, संजय चांदे, पार्थ जागुष्टे, राहुल भोसले, संतोष रहाटे, सुभाष साळवी, माजी सरपंच संतोष जावळे, शैलेश कांबळे, प्रकाश डिगे, सचिन लटके, पांडुरंग हरेकर, विठ्ठल हरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कामथे धरणातील सांडपाण्याचा हा प्रकार जलप्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण करत असून, याबाबतची ठोस कारवाई पुढील काही दिवसांत होत नसल्यास स्थानिक पातळीवर मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.