( विशेष/ प्रतिनिधी )
गेल्या नऊ महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात सेवा देणारे भूलतज्ञ डॉ. विनोद कानगुले यांच्या बदलीची चर्चा सध्या जिल्ह्यात गाजत आहे. डॉ. कानगुले यांची बदली खरंच झाली आहे का? त्यांच्या जागी नवीन डॉक्टर येणार आहेत का? भूलतज्ञच नसतील तर शस्त्रक्रिया कशा होणार? असे अनेक प्रश्न सध्या रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंता निर्माण करणारे ठरत आहेत.
डॉ. कानगुले हे जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेले एकमेव भूलतज्ञ डॉक्टर आहे. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेली भूल सुरक्षितपणे देणे, रुग्णाची प्रकृती तपासणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ सेवा देणे या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्या. त्यांची अचानक बदली झाल्यास सद्यस्थितीत सुरू असलेल्या आणि नियोजित असलेल्या शस्त्रक्रियांवर थेट परिणाम होणार आहे. कारण जिल्हा रुग्णालयात त्यांच्याशिवाय सध्या कोणताही भूलतज्ञ उपलब्ध नाही. पर्यायी व्यवस्था नाही? या बदलीसोबतच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, त्यांच्या जागी कोण नियुक्त होणार? कोणतीही अधिकृत माहिती सध्या उपलब्ध नसली, तरी पर्यायी डॉक्टरांची नियुक्ती झाली नसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
शासकीय यंत्रणेकडून डॉक्टरांची बदली करताना रुग्णसेवेवर होणाऱ्या परिणामांचा विचार झाला पाहिजे. आरोग्यसेवा ही केवळ “कागदोपत्री बदल्यांची प्रक्रिया” नसून, ती जनतेच्या जिवाशी निगडीत असलेली सेवा आहे. हे लक्षात घेऊनच शासन स्तरावर निर्णय घेणे आवश्यक आहे, भूलतज्ञाची अनुपस्थिती ही केवळ एक पद रिक्त असणे नाही, तर ती शस्त्रक्रियांना थांबवणारी आणि गंभीर रुग्णसेवेवर परिणाम करणारी बाब ठरते. अशा प्रकारच्या बदल्या कशाच्या आधारावर आणि कोणाच्या शिफारशीवरून होतात? हा सवाल सध्या सर्वसामान्य रुग्णांपासून ते वैद्यकीय कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात आहे. डॉक्टरांची आधीच कमतरता असलेल्या जिल्हा रुग्णालयात, जिथे एक डॉक्टर अनेक जबाबदाऱ्या पेलतोय, अशा ठिकाणी डॉक्टरांची बदली का केली जाते? हा निर्णय आरोग्य व्यवस्थेच्या व्यावहारिकतेला आणि गरजांनाही छेद देणारा असल्याचे बोलले जात आहे.
आरोग्यसेवा ही ‘वाटपाची बाब’ नव्हे!
या बदल्यामुळे केवळ एक पद रिक्त होत नाही, तर दर्जेदार व तत्काळ रुग्णसेवेवर थेट परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी या विषयात तात्काळ लक्ष घालून आवश्यक हस्तक्षेप करणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. आरोग्य यंत्रणेवर थेट परिणाम करणारे निर्णय हे फक्त कागदी प्रक्रिया म्हणून घेतले जाऊ नयेत, त्यामागे वस्तुस्थिती, गरज आणि प्रभाव यांचा ठोस विचार असावा, अशी सर्वसामान्यांची स्पष्ट भावना आहे. स्थानिक नागरीकांपासून ते रुग्णालयातील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच स्तरातून डॉ. कानगुले यांच्या बदलीबाबत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
“हो, अशा चर्चेची नोंद माझ्याही कानावर आली आहे. मात्र अद्यापपर्यंत मला कोणताही अधिकृत आदेश प्राप्त झालेला नाही. अधिकृत आदेशाशिवाय त्यांच्या जागेवर पर्यायी व्यवस्था करणे किंवा काहीही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही,”
– डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय