(रत्नागिरी)
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि. ३१ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील तब्बल २४३ गडकिल्ल्यांवर “खडा पहारा” ही विशेष राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश गडकिल्ल्यांवर होणारे मद्यपान, असभ्य वर्तन, तोडफोड, प्लास्टिक कचरा, अनधिकृत वास्तव्य व ऐतिहासिक वारशाचे नुकसान रोखणे हा आहे. गडकिल्ले हे केवळ पर्यटनस्थळ नसून महाराष्ट्राच्या इतिहासाची, शौर्याची व अस्मितेची साक्ष आहेत, ही जाणीव समाजात निर्माण करणे हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे.
ही मोहीम स्थानिक ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन, वनविभाग तसेच राज्य पुरातत्व विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार असून, प्रत्येक ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने निरीक्षण, जनजागृती व आवश्यक त्या ठिकाणी तत्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. गडकिल्ल्यांचे संरक्षण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, ती प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे, हा संदेश या मोहिमेद्वारे संपूर्ण राज्यात पोहोचविण्याचा निर्धार गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानने केला आहे.

